मागणी : सहकार राज्यमंत्र्यांना शेतकऱ्यांचे निवेदन
By Admin | Updated: December 21, 2014 00:13 IST2014-12-21T00:09:52+5:302014-12-21T00:13:05+5:30
फळबाग योजनेस मुदतवाढ द्या

मागणी : सहकार राज्यमंत्र्यांना शेतकऱ्यांचे निवेदन
मालेगाव : राज्य शासनाने फळबाग लागवड योजनेस येत्या फेब्रुवारी अखेरपर्यंत मुदतवाढ मिळावी, अशी मागणी सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांच्याकडे येथील शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
रोजगार हमी योजनेशी निगडीत फळबाग लागवड योजना आहे. अकराव्या पंचवार्षिक योजनेंतर्गत रोजगार हमी योजनेशी निगडीत डाळींब फळपीक लागवडीची योजना सन २०१४-१५मध्ये चालू ठेवण्यास शासनाने मंजुरी दिलेली आहे. परंतु जिल्ह्यात गारपीट व बेमोसमी पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात गहू, कांदा, डाळींब आदि पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी नवीन लागवड करण्याच्या मनस्थितीत नाहीत.
यामुळे डाळींब लागवडीपासून वंचित राहिलेले शेतकरी यांना सदर योजनेचा लाभ घेता यावा, यासाठी डाळींब लागवडीसाठी २८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ मिळावी, अशी मागणी अॅड. यशवंत मानकर, लक्ष्मण शेवाळे, साहेबराव रौंदळ, राजेश कचवे, त्र्यंबक बच्छाव आदिंनी दादा भुसे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. (वार्ताहर)