अधिभार वाढल्याने बॅँकांचे डिपॉझिट घटले
By Admin | Updated: April 16, 2017 00:50 IST2017-04-16T00:48:50+5:302017-04-16T00:50:38+5:30
पैशांचा खडखडाट : शहरातील ७० टक्के एटीएम बंद; तीन दिवसांपासून ग्राहकांची वणवण भटकंती

अधिभार वाढल्याने बॅँकांचे डिपॉझिट घटले
नाशिक : बॅँकेतून तीनपेक्षा अधिक वेळा पैसे काढल्यास लागणारा वाढीव अधिभार व एका वेळी कितीही पैसे काढण्यावर लादलेले निर्बंध मागे घेण्यात आल्याने बॅँकांमधून अधिकाधिक पैसे काढून घेण्याकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. त्यामुळे बॅँकांमध्ये होणारे डिपॉझिट व काढल्या जाणाऱ्या रकमेचा ताळमेळ बसत नसल्याने जिल्ह्यात पुन्हा पैशांची चणचण भासू लागली असून, ७० टक्के एटीएम पैशांअभावी बंद पडले आहेत.
नाशिक जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून चलनी नोटांची कमतरता असून, स्टेट बॅँक आॅफ इंडियाने रिझर्व्ह बॅँकेकडे साडेतीनशे कोटी रुपयांची मागणी नोंदविली आहे. मात्र आज, उद्या असे करत पैसे मिळण्यास अडचणी येत असल्याने आता सोमवारशिवाय पर्याय नसल्याचे स्टेट बॅँकेचे म्हणणे आहे. जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागासाठी स्टेट बॅँकेला जवळपास दररोज दहा कोटीहून अधिक रकमेची मागणी असते, अशीच मागणी अन्य राष्ट्रीयीकृत तसेच खासगी बॅँकांनाही असते. परंतु जिल्ह्यात फक्त दीडशे कोटी रुपये शुक्रवारपर्यंत शिल्लक होती. शनिवार व रविवार बॅँका जरी बंद असल्या तरी नागरिक एटीएमचा वापर करतात मात्र एटीएममध्येदेखील टाकण्यासाठी पैसे नसल्याने स्टेट बॅँकेसह अन्य राष्ट्रीयीकृत बॅँकांचे जवळपास ७० टक्के एटीएम गेल्या तीन दिवसांपासून बंद पडल्याने आर्थिक परिस्थिती नाजूक झाली असून, त्याचा थेट परिणाम नागरिकांवर होत आहे. बॅँकांकडून समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने गोंधळात भर पडली आहे.
नोटाबंदीनंतर दोन महिने नागरिकांनी नोटांची चणचण सहन केली, त्यानंतर परिस्थिती पूर्वपदावर येऊन रिझर्व्ह बॅँकेने पैसे काढण्यावरील निर्बंध उठविले, त्याचबरोबर कॅशलेस व्यवहाराला चालना मिळावी म्हणून बॅँकेतून तीनपेक्षा अधिकवेळा पैसे काढल्यास अधिभाराच्या रकमेत वाढ केली आहे.
या दोन्ही गोष्टींमुळे नागरिकांनी बॅँकेतून अधिकचे पैसे काढण्यावर भर दिल्याचे बॅँकांचे म्हणणे आहे. उदाहरणार्थ एरव्ही बॅँकेतून शंभर रुपये काढले गेले, तर ४० रुपयांचे डिपॉझिट होत होते, म्हणजेच बॅँकांच्या हातात खेळते पैसे कायम होते. आता मात्र परिस्थिती उलट झाली आहे. नागरिकांनी बॅँकेतून पैसे काढून ते जवळ बाळगणे वा साठवण्यास सुरुवात केली असून, त्यामुळे बॅँकांकडे अपेक्षित डिपॉझिट जमा होत नसल्याने चलनवलणाची साखळी खंडित झाल्याचे मानले जात असून, त्यातून नोटांची कमतरता भासू लागली आहे. साधारणत: मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता बॅँकर्स व्यक्त करीत
आहेत. (प्रतिनिधी)