पदव्युत्तर परीक्षांना सरासरी ५० टक्के गुणांचा निर्णय
By Admin | Updated: May 22, 2014 00:04 IST2014-05-21T23:55:17+5:302014-05-22T00:04:41+5:30
आरोग्य विद्यापीठ : विद्वत परिषदेचा ऐतिहासिक निर्णय; सर्वच पॅथींना होणार लाभ

पदव्युत्तर परीक्षांना सरासरी ५० टक्के गुणांचा निर्णय
आरोग्य विद्यापीठ : विद्वत परिषदेचा ऐतिहासिक निर्णय; सर्वच पॅथींना होणार लाभ
नाशिक : एमडी, एमएस आयुर्वेदच्या विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनामुळे आरोग्य विज्ञान विद्यापीठाने अखेर ॲग्रीगेट पासिंगचा ऐतिहासिक निर्णय घेतला असून यानिर्णयाचा लाभ सर्वच पॅथींच्या विद्यार्थ्यांना होणार आहे. उत्तीर्णतेसाठी आता सरासरी ५० टक्के गुण तर पेपरनिहाय किमान ४० टक्के गुण आवश्यक करण्यात आले आहेत.
आरोग्य विज्ञान विद्यापीठात झालेल्या विद्वत परिषदेच्या बैठकीत पदव्युत्तर विषयवर सुमारे तासभर चर्चा झाल्यानंतर ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे राज्यातील सर्व पदव्युत्तर विद्याशाखेतील विद्यार्थ्यांर्ना लाभ होणार आहे. यापुढे पदव्युत्तर विद्याशाखेतील परीक्षा उतीर्ण होण्यासाठी एकुण गुणांपैकी सरासरी किमान ५० टक्के गुण मिळविणे आवश्यक असेल परंतु सदर परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक विषयात पेपरनिहाय किमान ४० टक्के गुण मिळविणे आवश्यक करण्यात आले आहे.
विद्यापीठाने एमडी,एमएस आयुर्वेदचा निकाल जाहिर करतांना भारतीय चिकित्सा केंद्रीय परिषदेचे निकष डावलून निकाल जाहिर केला होता. त्यामुळे असंख्य विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले होते. परिषदेच्या निकषानुसार च निकाल जाहिर करावा अशी मागणी करीत या विद्यार्थ्यांनी आंदोलनाची भूमिका घेतली होती. या मागणीचा रेटा वाढल्याने आणि केंद्रीय परिषदेने देखील विद्यापीठाला ॲग्रीगेट पासिंगचे निकष मान्य करण्याचे पत्र दिल्यानंतर विद्यापीठाने हा विषय विद्वत परिषदेसमोर ठेवला होता. त्यामुळे परिषदेच्या निणॅयाकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
प्रारंभीपासून केंद्रीय परिषदांचा निकष डावलणार्या कुलगुरूंनी जेंव्हा हा विषय चर्चेला घेतला तेंव्हा त्यांना परिषदेच्या सदस्यांनी तीव्र विरोध केला. डेंटल आणि मेडीकल साठी ॲग्रीगेट पासींगचा निर्णय मान्य करण्यात आला आला असतांना आयुर्ेवेदासाठ अशी आठमुठे भूमिका का घेतली जात आहे असा प्रश्न परिषदेचे सदस्य डॉ. गजनान एकबोटे यांनी उपस्थित केली. त्यांना इतर सदस्यांनी देखील समर्थन दिले. सुमारे तासभर या विषयावर चर्चा झाली. यावेळी केंद्रीय परिषदेच्या निकषाचा मान राखण्याचा मुद्या काही सदस्यांनी उपस्थित केला. यावेळी झालेल्या चर्चेत पदव्युत्तर परिक्षांसाठी सरासरी ५० टक्के गुण आणि पेपरनिहाय किमान ४० टक्के गुण आवश्यक करण्याचा महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आला.
यावेळी जामकर यांनी सांगितले की, वैद्यकीय पदव्युत्तर विद्याशाखेसाठी पूर्वीपासूनच हा निर्णय लागू आहे. तथापी आयुर्वेद पदव्युत्तर विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांसाठी हिवाळी २०१३ परीक्षेसाठी लागू राहिल. व उन्हाळी सत्र २१०४ च्या परीक्षेपासून सर्व पदव्युत्तर विद्याशाखांसाठी सदर निर्णय लागू असणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
--इन्फो---विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे विद्यापीठाला जाग पदव्युत्तर अभ्यासक्रमासांठी केंद्रीय परिषदेच्या निकषानुसार गुण दयावेत या मागणीसाठी विद्यापीठाकडे मागणी करण्यात आली होती. परंतु विद्यापीठाने यासंदर्भात राजपत्र तसेच केंद्रीय परिषदेचे निकषही संदिग्ध असल्याची भूमिका घेत हा विषय त्यांनी विद्वत परिषदेवर ठेवला होता. विद्यार्थ्यांची मागणी आणि विद्वत परिषदेच्या सदस्यांनी देखील कुलगुरूंच्या भूुमिकेवर टिका केल्यानंतर तसेच ॲग्रीगेट पासींग देण्याचा आग्रह धरल्यानंतर ॲग्रीगेटचा निर्णय घेतला गेला. या समस्त एमडी,एमएस आयुर्वेद विद्यार्थ्यांच्या लढ्याचा विजय आहे.
- डॉ. आशुतोष गुप्ता,
एमडी.एमएस,विद्यार्थी संघटना.