विद्यार्थ्यांना मिळते तारीख पे तारीख
By Admin | Updated: July 8, 2014 01:09 IST2014-07-07T22:14:21+5:302014-07-08T01:09:25+5:30
विद्यार्थ्यांना मिळते तारीख पे तारीख

विद्यार्थ्यांना मिळते तारीख पे तारीख
विंचूर : औद्योगिक प्रशिक्षण संस्था अर्थात ‘आयटीआय’ने गत वर्षापासून आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविण्यास प्रारंभ केला आहे. मात्र त्यात नियोजनाचा अभाव असल्याने प्रवेशप्रक्रियेसाठी तारीख पे तारीख दिली जात असून, या प्रकारामुळे विद्यार्थी हैराण झाले आहेत.
पहिल्या वर्षी आॅनलाइन प्रक्रिया कोलमडल्यामुळे विद्यार्थ्यांना आयटीआयच्या गलथान कारभाराचा फटका बसला होता. उशिरा सुरू झालेली प्रवेशप्रक्रिया, वारंवार सर्व्हर डाऊन होणे, गुणवत्तेनुसार यादी नसणे याला कंटाळून विद्यार्थ्यांनी वर्ष वाया जाण्याच्या भीतीने आयटीआयचा नाद सोडून देत दुसऱ्या शाखांमध्ये प्रवेश घेतले. अनेक विद्यार्थ्यांना सर्व प्रवेश फेऱ्या करूनही आयटीआयला प्रवेश मिळाला नाही, तर दुसरीकडे मुदत संपल्यामुळे इतर शाखांचे प्रवेश बंद झाल्याने विद्यार्थ्यांचे नाहक वर्ष वाया गेले. मागील अनुभव पाहता वेळेवर प्रवेश सुरू करून आपल्या कार्यपद्धतीत बदल करण्याची आवश्यकता असताना सदर विभागाकडून मागील वर्षाचा कित्ता गिरवत आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेसाठी अद्याप निश्चित तारीख दिली जात नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
दहावी निकालानंतर आयटीआयमध्ये शिक्षण घेऊन करिअर घडविण्यासाठी सामान्य कुटुंबातील विद्यार्थी उत्सुक असतात. दरवर्षी हजारो विद्यार्थ्यांना आयटीआयमधून प्रवेश दिला जातो. गेल्यावर्षी प्रथमच आॅनलाइन पद्धतीने प्रवेशप्रक्रिया राबविण्यात आली; मात्र दहावीचा निकाल लागल्यानंतरही उशिराने सुरू झालेली प्रवेशप्रक्रिया पहिल्या दिवसापासूनच कोलमडली होती. यंदाही आॅनलाइन पद्धतीने प्रवेश राबविण्याचे जाहीर करण्यात आले असून, प्रवेशप्रक्रिया सुरू करण्याबाबत राज्यस्तरावरून तारखांमध्ये बदल होत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. आयटीआयमध्ये ५ जुलै रोजी प्रवेशप्रक्रि या सुरू होणार होती. मात्र ५ जुलै रोजी संकेतस्थळाने मान टाकल्यामुळे विद्यार्थी सायबर कॅफेवर दिवसभर बसून होते. तथापि, संकेतस्थळाने मुखपृष्ठाचे दर्शन दिल्यानंतर विद्यार्थ्यांना आनंद होण्याऐवजी हिरमोड झाला. कारण प्रवेशप्रक्रिया १० तारखेपासून
सुरू होईल, असा संदेश झळकू लागला.
शनिवारपासून प्रवेशप्रक्रिया सुरू होणार असल्याने विद्यार्थ्यांनी इंटरनेट कॅफेवर गर्दी केली, मात्र त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले. दहावीनंतर आयटीआयमध्ये शिक्षण घेऊन खासगी नोकरी मिळविण्याकडे नव्या पिढीचा ओढा आहे. त्यामुळे शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या सुरुवातीला आयटीआयमध्ये प्रवेशासाठी मोठी गर्दी होत असते. मार्च २०१४ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल १७ जूनला जाहीर झाला. त्यानंतर आठ दिवसांनी निकालपत्रही विद्यार्थ्यांच्या हाती मिळाले. इतरत्र प्रवेशप्रक्रिया सुरू झाली असली तरीही आयटीआयमध्ये प्रवेश घेणारे विद्यार्थी अद्याप थांबून आहेत.
प्रवेश मिळेलच याची शाश्वती नाही. त्यामुळे इतर ठिकाणी प्रवेश
बंद झाल्यास विद्यार्थ्यांमध्ये वर्ष
वाया जाण्याची भीती आहे. आॅनलाइन प्रवेशाची सविस्तर माहिती संस्थांची यादी व व्यवसायनिहाय अर्हता संकेतस्थळावर देण्यात
आली आहे. प्रवेशप्रक्रि या १० जुलैपासून सुरू होत असल्याचे व वेळापत्रकही त्याचदिवशी जाहीर होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. (वार्ताहर)