हनुमानवाडीतील उद्यानात अंधार
By Admin | Updated: July 7, 2014 00:41 IST2014-07-07T00:40:52+5:302014-07-07T00:41:14+5:30
हनुमानवाडीतील उद्यानात अंधार

हनुमानवाडीतील उद्यानात अंधार
हनुमानवाडी : पंचवटीतील हनुमानवाडी येथील उद्यानातील पथदीप गेल्या पंधरवड्यापासून बंद असल्याने अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे सायंकाळच्या सुमारास उद्यानात येणाऱ्या बालगोपाळांसह ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होत आहे.
प्रभाग क्रमांक ७ मधील हनुमानवाडीत एकमेव असलेले उद्यान आजघडीला अखेरच्या घटका मोजत आहे. उद्यान तयार होऊन अनेक वर्षे झाली, मात्र उद्यानात अद्यापही खेळणी बसविण्यात आलेल्या नाहीत. पूर्वीच्या ज्या एक-दोन खेळणी होत्या; त्यांचीही पूर्ण वाट लागली आहे. त्यामुळे बालगोपाळांना खेळण्यासाठी खेळणीच उरल्या नसल्याने बालकांचा हिरमोड होत आहे. तसेच पाण्याअभावी उद्यानातील झाडेदेखील सुकली आहेत. चार ते पाच हजार लोकसंख्या असलेल्या हनुमानवाडीकरांसाठी असलेल्या एकट्या उद्यानाचीही दुरवस्था झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यातच गेल्या पंधरा दिवसांपासून पथदीप बंद असल्याने उद्यानात अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे. यामुळे सायंकाळी व रात्री जेवण झाल्यानंतर उद्यानात शतपावलीसाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत आहे.
अंधारामुळे येथे मद्यपींचाही वावर वाढला असल्याचे नागरिकांनी सांगितले. महापालिकेने उद्यानात तातडीने खेळणी बसवाव्यात व आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)