दिंडोरीत करोडोंचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2016 23:52 IST2016-05-08T23:37:07+5:302016-05-08T23:52:30+5:30
कही खुशी, कही गम : द्राक्षबागांना काही अंशी जीवदान, भाजीपाल्याला फटका

दिंडोरीत करोडोंचे नुकसान
दिंडोरी : तालुक्याच्या बहुतांशी भागात रविवारी पावसाने दमदार हजेरी लावल्याने दुष्काळी परिस्थितीमुळे अडचणीत आलेल्या द्राक्षबागांना जीवदान मिळण्याच्या आशेने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला असतानाच तालुक्यातील करंजवन ओझे परिसरात वादळीवाऱ्यासह गारांनी दिलेल्या जोरदार तडाख्याने द्राक्ष, भाजीपाला, कांदा आदि विविध पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. यामुळे करोडोंचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. अनेक ठिकाणी गारांमुळे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांमध्ये कही खुशी कही गम अशी स्थिती निर्माण झाली आहे.
ओझे, करंजवन, खेडले येथे लाखोंची हानी
तालुक्यात मोठ्या प्रमाणात द्राक्षबागा असून महागड्या पॉलिहाउस शेडनेटमध्ये सिमला मिर्ची, फुले तसेच इतर भाजीपाला घेतला जातो. दुष्काळाची अत्यंत भयानक स्थिती असताना येथील शेतकऱ्यांनी टॅँकरने पाणी विकत घेत पिके वाचवण्याची धडपड सुरु केली होती.
रविवारी दुपारपासून दिंडोरी तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावत शेतकऱ्यांना दिलासा दिला. दुपारी वणी, पांडाणे परिसरात जोरदार पाऊस झाला. मात्र थोड्या विश्रांतीनंतर दुपारी ४ वाजेच्या सुमारास पुन्हा जोरदार वाऱ्यासह गारपीट झाली. याच दरम्यान करंजवन व ओझे परिसराला गारांनी झोडपून काढले. गारपिटीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. नुकत्याच एप्रिल छाटणी होऊन कोवळी फुट आलेल्या द्राक्षबागांच्या फांद्या व पाने गारांच्या माऱ्याने जमीनदोस्त झाले. तर पॉलीहाउस शेडनेटवर गारांचा खच साचून कागद नेट फाटून गारा यातील मिरची आदि भाजीपाल्यावर पडल्याने पिकाचे नुकसान झाले. वादळामुळे झाकलेल्या कांद्यावरील ताडपत्री उडून कांदा ओला झाला. करंजवन येथील संजय अपसुंदे, ओझे येथील आनंदराव जोपले, ज्ञानेश्वर गोजरे आदि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पिकांचे झालेले नुकसान पाहून शेतकरी हताश होत त्यांचे डोळे भरून आले. लाखो रु पये खर्च करून नुकसान झालेल्या शेडनेटचे कर्ज कसे फेडायचे, अशा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा राहिली आहे.
तालुक्यातील लखमापूर करंजवन, दिंडोरी, ओझे, म्हेळूस्के, खेडले, पांडाणे, माळेदुमाला,अंबानेर, खतवड, तळेगाव, दहेगाव, मोहाडी, चिंचखेड आदि विविध गावांना जोरदार पाऊस होत अनेक ठिकाणी कमी अधिक प्रमाणात गारपीट झाली. एकीकडे दुष्काळी परिस्थितीत दिलासा मिळाला असला तरी गारपिटीने द्राक्षाचे फुटीवर होणाऱ्या अनिष्ट परिणामाने शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. (वार्ताहर)