खामखेडा : दरवर्षी पावसाचे प्रमाण कमी कमी होत असल्याने पंधरा वर्षांपूवी दुथडी भरून वाहणारी गिरणा नदी काही वर्षांपासून दीपावलीनंतर म्हणजेच नोव्हेंबर महिन्यापासून कोरडीठाक असते. त्यामुळे नदीकाठावरील गावांना शेतीबरोबर पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. खामखेडा-भऊर मार्गाजवळील पात्रात कोल्हापूर टाइप बंधारे उभारण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.खामखेडा हे गाव गिरणा नदीकाठावर वसले आहे. गावात बागायती क्षेत्र मोठ्या प्रमाणात असून, ते गिरणा नदीच्या पाण्यावर अवलंबून आहे. पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी नदीकाठाजवळ विहिरी खोदून बँक, सोसायट्या आदिंकडून कर्ज घेऊन चार -पाच किमीपर्यंत पाइपलाइन केली आहे. परंतु पाच-सहा वर्षांपासून नदीपात्रातील पाणी कमी झाल्यानंतर परिणामी विहिरींच्या पाण्याची पातळी कमी कमी होत जाते. परिसरातील जनतेला जानेवारी महिन्यापासून चणकापूर धरण्याच्या आवर्तनावर अवलंबून राहावे लागते. नदीपात्रात पाणी नसल्याने विहिरींमध्ये पाण्याचा थेंबही राहत नाही. गिरणा नदीपात्रात कोल्हापूर टाइप बंधारे बांधल्यास चणकापूरच्या आवर्तनाचे पाणी अडवले जाऊन बंधाऱ्यात पाणी साचून नदीपात्राच्या परिसरातील भूगर्भातील पाणीपातळीत वाढ होऊन गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होईल. त्याचबरोबर शेतीच्या पाण्याचाही प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे. याबाबत अनेकवेळा मागणी करूनही संबंधित खात्याकडून दुर्लक्ष केले जाते. लोकप्रतिनिधींनी खामखेडा-भऊरदरम्यान कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. (वार्ताहर)
दुथडी भरून वाहणारी गिरणा नदी कोरडीठाक
By admin | Updated: January 25, 2016 22:51 IST