सहकारी बॅँकांची सुरक्षितता वाऱ्यावर
By Admin | Updated: June 14, 2016 23:59 IST2016-06-14T22:50:00+5:302016-06-14T23:59:22+5:30
निष्काळजीपणा : कर्मचाऱ्यांच्याही जिवाला धोका

सहकारी बॅँकांची सुरक्षितता वाऱ्यावर
नाशिक : दोन दिवसांपूर्वी नामको बॅँकेच्या पाटीलनगर शाखेत दरोड्याचा प्रयत्न शाखा व्यवस्थापकाच्या धाडसीवृत्तीमुळे हाणून पाडला गेला असला तरी शहरातील प्रामुख्याने अनेक सहकारी बॅँका व पतसंस्थांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. काही सहकारी बॅँका व पतसंस्थांमध्ये सुरक्षारक्षकच नसल्याने कर्मचाऱ्यांच्याही जिवाला धोका निर्माण झालेला आहे. व्यवस्थापन व संचालक मंडळांच्या निष्काळजीपणामुळे बॅँकांची सुरक्षितता ‘रामभरोसे’ असल्याचे दिसून येते.
दोन दिवसांपूर्वी त्रिमूर्ती चौक, पाटीलनगर येथील नामको बॅँकेच्या शाखेत बुरखाधारी दरोडेखोरांकडून रोकड लुटण्याचा प्रयत्न झाला होता. बॅँकेच्या शाखाधिकाऱ्याने धाडस दाखवत दरोडेखोरांना अटकाव केल्याने दरोड्याचा प्रयत्न फसला होता. मिळालेल्या माहितीनुसार सदर शाखेत दोनच कर्मचारी कार्यरत असून, तेथे सुरक्षारक्षकाची नेमणूक केलेली नाही. सदर शाखेत उलाढाल कमी होत असल्याने दोनच कर्मचारी नियुक्त केल्याचे सूत्रांनी सांगितले. वास्तविक बॅँकांमध्ये किमान चार ते सहा कर्मचारी नियुक्त करणे अपेक्षित असते. नामको बॅँकेप्रमाणेच शहरातील अन्य काही सहकारी बॅँका व पतसंस्थांच्या शाखांमध्येही सुरक्षा रक्षकांच्या नेमणुका नाहीत. एटीएम केंद्राच्या ठिकाणीही सुरक्षा रक्षक आवश्यक असताना त्यांचीही सुरक्षा रामभरोसे सोडून दिली जाते. पोलीस आयुक्तालयाने यापूर्वीच शहरातील बॅँकांच्या संचालक व प्रशासकांची बैठक घेऊन सुरक्षिततेसंबंधी आवश्यक त्या सूचना दिल्या होत्या. परंतु त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्यानेच दरोड्याच्या घटनांना सामोरे जावे लागत असल्याची भावना कर्मचारीवर्गात आहे. सुरक्षा रक्षक नसल्याने कर्मचाऱ्यांच्याही जिवाला धोका निर्माण झाला आहे. उलाढाल कमी होते म्हणून बॅँक शाखेत अपुरा कर्मचारीवर्ग नियुक्त करणे चुकीचे असल्याचीही चर्चा असून, बॅँक व्यवस्थापन व संचालक मंडळाच्या निष्काळजीपणामुळेच बॅँकांची सुरक्षितता धोक्यात आल्याचे बोलले जात आहे. (प्रतिनिधी)