अध्यक्षांच्या आढावा बैठकीवरून वादंग
By Admin | Updated: June 24, 2014 00:35 IST2014-06-23T23:37:18+5:302014-06-24T00:35:08+5:30
नाशिक : प्रत्येक सोमवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा परिषद अध्यक्षांकडून सर्व खातेप्रमुखांची बैठक घेऊन कामकाजाचा व नियोजनाचा आढावा घेण्यात येतो.

अध्यक्षांच्या आढावा बैठकीवरून वादंग
नाशिक : प्रत्येक सोमवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा परिषद अध्यक्षांकडून सर्व खातेप्रमुखांची बैठक घेऊन कामकाजाचा व नियोजनाचा आढावा घेण्यात येतो. जिल्हा परिषद अध्यक्षांच्या आढावा बैठकीस पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले जात नाही, त्यांच्या अडीअडचणी सोडविल्या जात नाहीत, असा आरोप उपाध्यक्ष संपतराव सकाळे यांनी केला आहे.
विशेष म्हणजे सुरुवातीला जिल्हा परिषद अध्यक्ष जयश्री पवार घेत असलेल्या खातेप्रमुखांच्या आढावा बैठकीस उपाध्यक्षांसह सर्वच पदाधिकाऱ्यांना बोलविले जात होते व त्यांच्या अडीअडचणी व सूचनांवर चर्चा होत होती, असे सकाळे यांचे म्हणणे आहे. त्यातल्या त्यात सोमवारी (दि.२३) झालेल्या आढावा बैठकीस सिन्नर तालुक्यातील पाणीपुरवठा योजनेसंदर्भात आढावा घेण्यासाठी सभापती राजेश नवाळे यांनाही योगायोगानेच बोलविण्यात आल्याचे कळते.
उपाध्यक्ष संपतराव सकाळे यांनी सांगितले की, खातेप्रमुखांच्या आढावा बैठकीस पदाधिकाऱ्यांना बोलविल्यास पदाधिकारी त्यांच्या समस्या व अडचणी मांडतीलच, परंतु पदाधिकाऱ्यांकडे सदस्यांनी मांडलेल्या सूचना व केलेल्या तक्रारींचाही या बैठकीत आढावा घेण्यास मदत होईल, असे त्यांचे म्हणणे आहे.
सकाळे यांनी केलेल्या आरोपावरून आता अध्यक्षांच्या आढावा बैठकीबाबत राष्ट्रवादी आणि कॉँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्येच वादंग सुरू झाल्याची चर्चा आहे.
(प्रतिनिधी)