सत्तेत वाटा, तरीही विकासाला फाटा

By Admin | Updated: January 20, 2017 01:07 IST2017-01-20T01:07:27+5:302017-01-20T01:07:42+5:30

दुर्लक्षित नाशिकरोड : प्रकल्पांची लागली वाट; लोकप्रतिनिधी आणि पालिका प्रशासनाला वावडे

Contribution to power, but still the developmental phase | सत्तेत वाटा, तरीही विकासाला फाटा

सत्तेत वाटा, तरीही विकासाला फाटा

 मनोज मालपाणी, नाशिकरोड :
गत २५ वर्षांच्या महानगरपालिका लोकप्रतिनिधींच्या कार्यकाळात नाशिकरोड विभागाकडे एकदा सर्वोच्च महापौरपद, तीन वेळा स्थायी समिती सभापती व दोन वेळा महापौरपद मिळाले. मात्र तरीदेखील महत्त्वाचे प्रकल्प, कामे व गावठाण-झोपडपट्टीतील विकासाची कामे रेंगाळलेली आहेत.
नगरसेवकांच्या २५ वर्षांच्या कार्यकाळात विविध पक्षांची सत्ता मनपामध्ये आली. तर नाशिकरोड विभागावरदेखील कॉँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना यांचे वर्चस्व २५ वर्षांत राहिलेले आहे. चौथ्या पंचवार्षिकमध्ये २०१० ते २०१२ या अडीच वर्षांच्या काळात शिवसेनेच्या नयना वालझाडे (घोलप) यांनी महापौरपद भूषविले. महापौरपदाच्या काळात वालझाडे यांनी बिटको रुग्णालयाच्या नूतन इमारतीच्या कामाला मंजुरी देऊन निधीदेखील दिला. त्यामुळे रुग्णालयाच्या नूतन इमारतीचे काम लागलीच सुरू झाले. मात्र ते अद्यापही सुरूच आहे. तसेच नाशिकरोड मनपा विभागीय कार्यालय इमारत त्यांच्याच काळात उभी राहिली. वडनेर येथील वालदेवी नदीवरील नवीन पूल, चेहेडी जलशुद्धीकरण केंद्र, रस्ते, भूमिगत गटारी, शाळा इमारत आदि विकासकामे झाली. दुसऱ्या पंचवार्षिकमध्ये आगर टाकळी भागातून नगरसेवक म्हणून निवडून आलेले अशोक दिवे ९८-९९ या वर्षासाठी महापौर झाले होते. दिवे यांचा वॉर्ड पूर्व नाशिक विभागात असला तरी त्यांची जवळीक नाशिकरोड विभागाशी सर्वाधिक होती. त्यांच्या काळात सर्वांत मोठ्या प्रमाणात रस्त्यावरील अतिक्रमणाविरुद्ध मोहीम राबवून रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले. दिवेंच्या काळात इतर छोटी-मोठी कामे झाली असली तरी अतिक्रमण काढण्याव्यतिरिक्त दुसरे मोठे काम झाले नाही.
तर पहिल्या पंचवार्षिकमध्ये कॉँग्रेसचे रामदास सदाफुले, रंजना बोराडे या उपमहापौर झाल्या होत्या. सदाफुले व बोराडे यांच्या काळात काही प्रमाणात विकासाची कामे झालीत. पण ‘शोभे’सारखे असणाऱ्या उपमहापौर हे पद नाशिकरोडला नावापुरते मिळाले. पहिल्या पंचवार्षिकमध्ये कॉँग्रेसचे निवृत्ती अरिंगळे यांनी स्थायी समिती सभापतिपद भूषविले. अरिंगळेंच्या काळात गंधर्वनगरी, लोकमान्यनगर, जिजामातानगर असा त्यांचा वॉर्ड असलेल्या भागांत रस्ते रुंदीकरण, पहिल्यांदाच पदपथ, उद्यान, खेळणी, पथदीप अशी कामे झालीत. अरिंगळे स्थायी सभापती असताना रंजना बोराडे उपमहापौर होत्या. तर चौथ्या पंचवार्षिकमध्ये २०११-१२ या काळात शिवसेनेचे रणजित नगरकर स्थायी सभापती झाले. विशेष म्हणजे याच काळात शिवसेनेच्या नयना वालझाडे महापौर होत्या. तर २०१३-१४ या काळात मनसेचे रमेश धोंगडे स्थायी सभापती झाले. एक वेळा महापौरपद, दोन वेळा उपमहापौर, तीन वेळा स्थायी समिती सभापतिपद मिळूनही त्या मानाने नाशिकरोड विभागात पाहिजे त्या प्रमाणात विकासकामे झाली नाही.

Web Title: Contribution to power, but still the developmental phase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.