देश घडविण्यासाठी योगदान द्या
By Admin | Updated: August 9, 2014 00:50 IST2014-08-09T00:33:13+5:302014-08-09T00:50:37+5:30
भुतडा : मनभावन मधुर मीलन समारोह

देश घडविण्यासाठी योगदान द्या
नाशिक : समाजात पडत चाललेल्या अनिष्ट प्रथांना तिलांजली देऊन समाजाबरोबरच राष्ट्राच्या उभारणीत योगदान देण्याचे आवाहन रामकुमार भुतडा यांनी केले. अखिल भारतीय मारवाडी महासभेच्या मनभावन मधुर सावन मीलन समारंभाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
यावेळी ते पुढे म्हणाले समाजात आजकाल ज्येष्ठांचा आदर करणे कमी झाले आहे. लग्नाच्या समस्यांबाबत मार्गदर्शन करताना त्यांनी सध्या मुलींचे लग्न उशिरा होतात. पूर्वी लवकर व्हायचे. टीव्हीसारख्या साहित्यांमुळे मुले लवकर वयात येत असताना त्यांची लग्ने लांबणे चांगले लक्षण नसून वयात लग्न न झाल्यास पुढे अनेक समस्या उद्भवतात. जन्माला येणारी मुले सशक्त नसतात. उशिरा होणारी लग्नेही फार काळ टिकत नाहीत. त्यामुळे लग्न आधी करा आणि नंतर शिक्षण घ्या, असा सल्ला त्यांनी तरुणींना दिला. याप्रसंगी व्यासपीठावर रमेश मालू, राजाराम भांगडिया, शोभना बुब, सचिन मालपाणी, रामविलास बुब, अमृतलाल मुंदडा, महेश मुंदडा, पुष्पा तोष्णीवाल, शैला कलंत्री, अंजनुकुमार मुंदडा, रामनिवास जेठाविया, कमलकिशोर चांडक आदि उपस्थित होते. दीपप्रज्वलन आणि महेश पूजनाने कार्यक्रमास प्रारंभ झाला. त्यानंतर समाजातील सुमारे २५ ज्येष्ठ नागरिकांचा सहस्रचंद्र दर्शन सेहळ्यानिमित्त सत्कार करण्यात आला. त्यानंतर जवाहर बाहेती, मनीष मुंदडा, रामनिवास जेथलिया, कमलकिशोर चांडक यांनी मनोगत व्यक्त केले. समाजातील गुणवंतांचा सत्कार झाल्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाने कार्यक्रमाची सांगता झाली. प्रदीप बुब, शोभना बुब, सचिन मालपाणी यांनी प्रास्तविक केले. प्रमुख पाहुणे संदीप काबरा यांनी समाजातील महिलांनीही संघटना वाढवून अन्यायाविरोधात प्रसंगी रस्त्यावर उतरण्याचे आवाहन केले. अध्यक्ष सतीश चरखा यांनी मनोगत व्यक्त केले. (प्रतिनिधी)