जिल्ह्यात संततधार सुरूच
By Admin | Updated: August 8, 2015 23:29 IST2015-08-08T23:23:53+5:302015-08-08T23:29:03+5:30
दुबार पेरण्या टळणार : १३४ मिमी पावसाची नोंद

जिल्ह्यात संततधार सुरूच
नाशिक : पूर्व भागात दडी मारलेल्या पावसाने गेल्या दोन-तीन दिवसांपासून जिल्ह्यात सर्वत्र कमी-अधिक स्वरूपात का होईना हजेरी लावल्याने या भागातील खरिपाच्या दुबार पेरण्यांवरील संकट टळल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. शुक्रवारी सकाळपर्यंत १३४.५ मिलिमीटर पावसाची नोेंद करण्यात आली आहे.
दोेन दिवसांपासून काहीशी उघडीप घेतलेल्या पावसाने काल (दि.८) सकाळपासूनच हलक्या व मध्यम स्वरूपात हजेरी लावली. दुपारपर्यंत पाऊस अधून-मधून सुरूच होता. नाशिक शहरासह जिल्ह्यातही पावसाने चांगली हजेरी लावल्याने बळीराजापुढील संकट काहीसे दूर झाल्याचे चित्र आहे. तरीही अद्याप जिल्ह्यातील पूर्व भागात दमदार पावसाची अपेक्षा आहे.
शुक्रवारी सकाळी आठ वाजेपर्यंत तालुकानिहाय झालेल्या पावसाची मिलिमीटरमध्ये आकडेवारी अशी- नाशिक - ४.६, इगतपुरी-२७, दिंडोरी-१२, पेठ-१३, त्र्यंबकेश्वर-७, मालेगाव-१५, नांदगाव-२.८, चांदवड-७.६, कळवण-८.८, बागलाण-८.३, सुरगाणा-९.४, देवळा- ७, निफाड-३, सिन्नर-२, येवला-७ अशी एकूण १३४. ५ मिलिमीटर पावसाची जिल्ह्णात नोेंद करण्यात आली आहे. पश्चिम पट्ट्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात चांगली वाढ झाली असून, पूर्व भागातील येवला, नांदगाव, मालेगाव व सिन्नर या तालुक्यांतील काही गावांमध्ये दोन दिवसांपासून पावसाने तुरळक स्वरूपात का होईना हजेरी लावल्याने दुबार पेरणीचे संकट टळण्याची शक्यता आहे.
काल शनिवारी शहर व जिल्ह्णात पावसाची रिपरिप सुरूच होती. दिवसभर अधून-मधून हलक्या व मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडत होत्या. (प्रतिनिधी)