मालेगावला सातबारा उतारा संगणकीकरणाचे काम सुरू
By Admin | Updated: June 25, 2014 00:17 IST2014-06-24T21:08:11+5:302014-06-25T00:17:23+5:30
मालेगावला सातबारा उतारा संगणकीकरणाचे काम सुरू

मालेगावला सातबारा उतारा संगणकीकरणाचे काम सुरू
मालेगाव : राज्य शासनाच्या निर्णयानुसार मालेगाव येथील तहसील कार्यालयात सातबारा उतारा संगणकीकरणाच्या कामाला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत ४४ गावांतील सातबारा उतारा संगणकीकरणाचे काम पूर्णत्वास आले आहे. उर्वरित काम दि. ३० जूनपर्यंत पूर्णत्वास येणार आहे.
सातबारा उतारे आता संगणकाच्या एका क्लिकवर पाहता येणार आहेत. एवढेच नव्हे तर त्याची प्रिन्टही काढता येणार आहे. या पार्श्वभूमीवर सातबारा उताऱ्यांच्या संगणकीकरणाला मालेगाव तहसील कार्यालयात यापूर्वीच प्रारंभ झाला आहे. मालेगाव तालुक्यात १५० गावे आहेत तर १० महसूल मंडळे आहेत. दि. १ ते १५ जून या कालावधीत पाच मंडळे, तर दि. १६ ते ३० जून २०१४ या कालावधीत उर्वरित पाच मंडळांतील गावातील सातबारा उतारा संगणकीकरणाचे काम होणार आहे. तशी व्यवस्था तहसील कार्यालयातील सभागृहात करण्यात आली आहे. सकाळी ८ ते दुपारी ४ आणि दुपारी ४ ते रात्री ८ पर्यंत अशा वेळेत संगणकीकरण करण्यात आली आहे. सकाळी ८ ते दुपारी ४ आणि दुपारी ४ ते रात्री ८ पर्यंत अशा वेळेत संगणकीकरण करण्यात येत आहे. त्यासाठी १५ संगणक व १५ आॅपरेटर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
सातबारा उतारा संगणकीकरणाच्या कामावर देखरेख व नियंत्रणासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संगणकीय कामातील त्रुटी दूर करण्यासाठी ४ नायब तहसीलदारांना महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमानुसार अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. पर्यवेक्षक म्हणून नायब तहसीलदार संजय तराळकर, कूळ वहिवाट शाखेचे अव्वल कारकून व्ही. जी. पाटील काम पाहत आहेत. सातबारा उताऱ्याचे संगणकीकरण करताना आतापर्यंत झालेल्या नोंदी, पीक पाहणीच्या नोंदी करण्यात येत आहेत. त्यानंतर प्रिंट काढून त्याची हस्तलिखित सातबारा उताऱ्याच्या प्रतीशी तंतोतंत पडताळणी केली जात आहे. संगणकीकृत केलेले सर्व सातबारा उतारा म्हणजे १०० टक्के उतारे संबंधित तलाठी तपासतील. त्यानंतर मंडळाधिकारी ३० टक्के, नायब तहसीलदार १० टक्के, तहसीलदार पाच टक्के, तर उपविभागीय अधिकारी तीन टक्के उताऱ्याची तपासणी करतील. त्यामुळे काम अचूक होईल, असा विश्वास तहसीलदार पाटील यांनी व्यक्त केला आहे. आतापर्यंत ४४ गावांतील सातबारा उताऱ्यांचे काम पूर्णत्वास आले आहे. सातारा संगणकीकरणामुळे कोणत्याही नागरिकाला सातबारा उतारा संगणकावर पाहायला मिळणार आहे. तसेच त्याला आवश्यकता असेल तर त्याची प्रिन्टही काढता येईल.