येवल्यात नगराध्यक्षपदावर काँग्रेसचा दावा
By Admin | Updated: May 23, 2014 00:32 IST2014-05-23T00:12:08+5:302014-05-23T00:32:15+5:30
येवला नगर परिषदेत राष्ट्रवादीने आघाडीचा धर्म पाळून काँग्रेसला नगराध्यक्षपदाची संधी द्यावी.

येवल्यात नगराध्यक्षपदावर काँग्रेसचा दावा
येवला : येवला नगर परिषदेत काँग्रेसचे एकमेव नगरसेवक संजय कासार असले तरी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडीचा धर्म पाळून काँग्रेसला नगराध्यक्षपद आगामी दहा महिन्यांसाठी द्यावे या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस, अपक्षांसह भाजपा-सेनेच्या सर्वच नगरसेवकांना येवला विश्रामगृहावर बुधवारी सायंकाळी स्नेहभोजनाचे निमंत्रण पाठविल्याने नगराध्यक्षपदाबाबतची चर्चा शहरात सुरू झाली आहे. येवला पालिका सभागृहात २३ नगरसेवकांत राष्ट्रवादी काँग्रेस-१६, भाजपा-३, सेना-१, अपक्ष-२ व काँग्रेसचे एकमेव संजय कासार असे पक्षीय बलाबल आहे. राष्ट्रवादी काँग्रेस बहुमतात असल्याने, प्रारंभी अडीच वर्षांच्या काळात राजश्री पहिलवान यांना दहा महिन्यांचा कालावधी मिळाला. बलदंड नगरसेवकांनी या परिस्थितीत दबक्या आवाजात अबोला ठेवून नापंसतीदेखील व्यक्तकेली होती. यानंतर दहा टक्के लोकवर्गणी विविध योजनांसाठी जमा करण्याचे कौशल्य असणार्या मात्तबरांची वर्णी लागावी म्हणून दिग्गजांच्या शर्यतीत वजनदार मंडळीनी रस घेऊन नीलेश पटेल यांना नगराध्यक्षपदाचे २० महिने मिळाले. त्यांचा कार्यकाल १५ जून रोजी संपत आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ओबीसी आरक्षणाचा नगराध्यक्षपदा साठी सहा प्रबळ दावेदार आहेत. यात राष्ट्रवादी काँग्रेस गटनेते प्रदीप सोनवणे, मुश्ताक शेख, सरला निकम, नीता परदेशी, जयश्री लोणारी, शबानाबानो शेख यांची प्रबळ दावेदारी आहे. याशिवाय विद्यमान नगराध्यक्ष नीलेश पटेल हेदेखील ओबीसीत समाविष्ट आहे. या परिस्थितीत काँग्रेसचे एकमेव नगरसेवक संजय कासार यांनी राष्ट्रवादीने आघाडीचा धर्म पाळून काँग्रेसला नगराध्यक्षपदाची संधी द्यावी, अशी हाक देण्याकामी नगरसेवकांना विश्रामगृहावर स्नेहभोजनाला बोलावल्याचे वृत्त आहे. आघाडीचा धर्म राष्ट्रवादीने पाळावा यासाठी भाजपा-सेनेचे नगरसेवकांना विनवणी करण्याचे कारण काय? यावर नगरसेवक संजय कासार यांनी मौन धरले असले तरी, राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडीचा धर्म पाळला नाही तर, भाजपा-सेनेसह अपक्ष व राष्ट्रवादीचे तत्कालीन परिस्थितीत असंतुष्ट राहणारे नगरसेवक साथीला घेऊन काही नवीन खेळी करता येईल का? या विचारानेही सर्वच पक्षांच्या नगरसेवकांना आघाडीचा धर्म राष्ट्रवादी काँग्रेसने पाळावा हे सांगण्यासाठी बोलावले असल्याची चर्चा, समर्थकांमध्ये सुरू आहे. (वार्ताहर)