कळवण नगरपंचायतच्या मतदार याद्यांमध्ये गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:21 IST2021-02-23T04:21:49+5:302021-02-23T04:21:49+5:30
बदलून गेलेल्या मतदारांची नावे प्रारूप मतदार यादीत समाविष्ट करण्यात आल्याने मतदार यादींचा सावळागोंधळ समोर आला असून, कळवण ...

कळवण नगरपंचायतच्या मतदार याद्यांमध्ये गोंधळ
बदलून गेलेल्या मतदारांची नावे प्रारूप मतदार यादीत समाविष्ट करण्यात आल्याने मतदार यादींचा सावळागोंधळ समोर आला असून, कळवण नगरपंचायतच्या १७ प्रभागांमधील प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर या मतदार यादीमधील हा सावळा गोंधळ उघड झाला आहे. अनेकांनी या मतदार याद्यांवर शंका उपस्थित केली आहे. मतदार यादीमध्ये दुबार नावे कमी करण्याचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने राबविलेला असताना पुन्हा या याद्यांमध्ये दुबार नावे आली कशी, याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. अनेक मतदार गेल्या अनेक वर्षांपासून प्रभागातून बदलून गेले आहेत, तरीही त्यांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यात आली आहे. तर काही प्रभागांत अन्य प्रभागातील मतदारांची नावे समाविष्ट करून प्रभागरचनेची तोडफोड करण्याचे काम केले असून, अनेक प्रभागांत शेजारील मतदारांची नावे आढळून येत नसल्याने इच्छुक उमेदवार व समर्थक यांची डोकेदुखी वाढली आहे. एकाच कुटुंबातील नावाची तोडफोड केली असल्यामुळे मतदान प्रक्रियेवर परिणाम होऊन मतदानाचा टक्का घसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
इन्फो
प्रारूप मतदार याद्यांत चुका
अनेक प्रभागात समाविष्ट असलेल्या भागातील व परिसरातील मतदार शेजारच्या प्रभागाला जोडून मतदारांची तोडफोड प्रारूप मतदार यादी झाली असल्याने या प्रारूप मतदार याद्या इच्छुक उमेदवारांच्या व मतदारांच्या हक्कावर गंडातर आणणार्या असल्याचा आरोप मतदारांनी केला आहे. कळवण नगरपंचायत प्रभाग प्रारूप मतदार याद्या चुकीच्या आणि अन्यायकारक असल्याने मतदारांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा हा प्रकार असल्याने कळवण नगरपंचायतच्या १७ प्रभागांमधील मतदार याद्या दुरुस्ती कार्यक्रम प्रशासन व निवडणूक आयोगाने हाती घ्यावा, अशी मागणी मतदारांनी केली आहे.
इन्फो
गेल्या निवडणुकीतही होता पोरखेळ
लोकशाहीतील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असलेल्या निवडणूक यंत्रणेवरील विश्वासाला तडा देण्याचे काम कळवणच्या नगरपंचायतच्या पहिल्या निवडणुकीतदेखील झाले होते. मागील पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीत आधी प्रभागरचना, मग चुकीचे आरक्षण सोडत, पुन्हा आरक्षण सोडत निर्माण झालेल्या चुका दुरुस्त होतात न होतात तोच प्रारूप याद्या आणि अंतिम मतदार यादीतील घोळांचे वादळ निर्माण झाले होते. एकापाठोपाठ एक चुका, दोष व त्रुटी पहिल्या निवडणुकीतदेखील निर्माण झाल्या होत्या.