बारावी परीक्षांबाबत विद्यार्थी-पालकांत संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:14 IST2021-05-10T04:14:11+5:302021-05-10T04:14:11+5:30

मालेगाव : दहावीच्या परीक्षा रद्द केल्या मात्र बारावीच्या परीक्षांचे काय, बारावी परीक्षांबाबत स्पष्टता नसल्याने प्रवेश परीक्षेचा ...

Confusion among students and parents about the 12th exam | बारावी परीक्षांबाबत विद्यार्थी-पालकांत संभ्रम

बारावी परीक्षांबाबत विद्यार्थी-पालकांत संभ्रम

मालेगाव : दहावीच्या परीक्षा रद्द केल्या मात्र बारावीच्या परीक्षांचे काय, बारावी परीक्षांबाबत स्पष्टता नसल्याने प्रवेश परीक्षेचा अभ्यास करावा की बारावीचा, हा प्रश्न विद्यार्थ्यांना अडचणीत टाकत आहे. त्यामुळे शासनाने लवकरात लवकर योग्य तो निर्णय घेऊन बारावीच्या परीक्षेसंदर्भातील भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी विद्यार्थी आणि पालकांकडून केली जात आहे

देशभरातील कोरोना स्थिती पाहता, महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला; मात्र बारावीच्या परीक्षेबाबत निर्णय कधी घेतला जाणार, असा प्रश्न विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांकडून विचारला जात आहे. वर्षभरापेक्षा अधिक काळ झाला, विद्यार्थी अभ्यास करत आहेत; मात्र सीबीएसई आणि राज्य मंडळाकडून बारावीच्या परीक्षांबाबत अद्याप काहीच स्पष्टता देण्यात आलेली नाही. त्यामुळे काही विद्यार्थ्यांनी ऑफलाईन परीक्षा न घेता ती रद्द करून इतर पर्यायांचा विचार करावा आणि तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे. बारावी परीक्षांबाबत स्पष्टता नसल्याने प्रवेश परीक्षेचा अभ्यास करावा की बारावीचा, हा प्रश्न विद्यार्थ्यांना अडचणीत टाकत आहे. लवकरात लवकर योग्य तो निर्णय घेऊन बारावीच्या परीक्षेसंदर्भातील भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली आहे.

कोरोनामुळे दहावीची परीक्षा रद्द झाली मग बारावीच्या परीक्षेचे काय? दहावीप्रमाणे बारावी परीक्षेबाबत सारखाच निर्णय काय? नाही? विद्यार्थ्यांनी आणखी किती दिवस बारावीचा अभ्यास करायचा, असे अनेक प्रश्न विद्यार्थी आणि पालकांकडून केले जात आहेत. याव्यतिरिक्त ‘कॅन्सल # १२ बोर्ड एक्झाम २०२१’ अशी ट्विटरवर मोठ्या प्रमाणात मोहीम राबविण्यात येत आहे. कारण सध्याच्या कोरोना प्रादुर्भावात आता ऑफलाईन परीक्षा शक्य नसल्यामुळे इतर पर्यायांची तातडीने चाचपणी करून योग्य तो निर्णय घ्यावा, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

राज्यात जवळपास दीड लाख बारावीचे विद्यार्थी आहेत. सोशल मीडियावर करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात ७८ टक्के विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षा रद्द करावी, अशी मागणी केली आहे तर ११ टक्के विद्यार्थ्यांनी इतर पर्याय अवलंबून परीक्षा घ्यावी, असे म्हटले आहे तर इतर ११ टक्के विद्यार्थिनी ऑफलाईन परीक्षा द्यायला तयार आहेत, असे स्पष्ट होत आहे.

बारावीनंतर प्रवेशावर त्याचा परिणाम होऊ शकतो का, या संदर्भात तज्ज्ञांशी संवाद साधला असता त्यांनी दिलेल्या माहितीनुसार बारावी ऑफलाईन परीक्षा रद्द केल्यास अंतर्गत मूल्यांकन करून त्याबाबत समान निकषाच्या आधारे विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करता येऊ शकतो तसेच अंतर्गत मूल्यमापनातून निकाल जाहीर झाल्यानंतर अभ्यासक्रमाच्या प्रवेशावेळी बारावी गुणांचा निकष यावर्षी शिथीलदेखील करता येऊ शकतो. मेडिकल, इंजिनिअरिंग आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांना इतर प्रवेश परीक्षेच्या आधारे प्रवेश दिला जाऊ शकतो. आर्ट्स, कॉमर्स आणि इतर अभ्यासक्रम ज्यांची प्रवेश परीक्षा होत नाही त्या अभ्यासक्रमांनासुद्धा विद्यापीठ कॉलेजस्तरावर प्रवेश परीक्षा घेतली जाऊन त्याआधारे प्रवेश घेता येऊ शकेल.

तज्ज्ञांनी सुचवलेल्या काही गोष्टी शक्य असल्या तरी केंद्र सरकार आणि राज्याच्या शिक्षण विभागाला या संदर्भातील निर्णय घ्यावा लागेल. तसेच या सर्व गोष्टींसाठी तयारी करावी लागेल. प्रवेश परीक्षेचा अभ्यास करायचा की बारावी परीक्षेचा अभ्यास यामध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी एक कोणता तरी निर्णय घेऊन स्पष्टता आणणे गरजेचे आहे. त्यामुळे आता बारावी परीक्षांबाबत प्रशासन काय निर्णय घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

कोट...

केंद्र सरकार, राज्य सरकार व शिक्षण विभाग यांच्यानुसार निर्णय होईल. कोरोनाच्या परिस्थितीनुसार जो निर्णय होईल. तो सध्या याच्यावर चर्चा नाही.

- नितीन उपासनी, शिक्षण उपसंचालक, नाशिक विभाग

विद्यार्थ्यांचे मूल्यमापनासाठी परीक्षा घेणे गरजेचे आहे. पण विद्यार्थी किती दिवस परीक्षेची वाट पाहात आहेत. काहीतरी उपाययोजना सरकारने करावी.

- प्रा रवींद्र मोरे, मालेगाव तालुकाध्यक्ष, नाशिक जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना.

Web Title: Confusion among students and parents about the 12th exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.