संघर्ष सभा-सांस्कृतिक दहशतवादाची आव्हाने
By Admin | Updated: March 7, 2015 01:18 IST2015-03-07T01:17:38+5:302015-03-07T01:18:06+5:30
संघर्ष सभा-सांस्कृतिक दहशतवादाची आव्हाने

संघर्ष सभा-सांस्कृतिक दहशतवादाची आव्हाने
नाशिक : गोविंद पानसरे यांनी इतिहास हा सामान्य माणसांमुळे लिहिला गेला. हे सांगण्यास सुरुवात केली होती. इतिहास नेत्यांमुळे नव्हे तर सामान्य माणसांमुळेच लिहिला जातो. पानसरे यांनी नेमके तेच इतिहासातून सामान्य माणसाला मोठे करण्याबरोबरच आधुनिकतेची कास धरण्याचा सल्ला देण्याचे काम सुरू होते. त्यामुळेच पानसरे यांची हत्त्या ही आधुनिकतेला विरोध करणाऱ्यांनी केली आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे यांनी केले.प. सा. नाट्यमंदिरात कविवर्य नारायण सुर्वे वाचनालय व सामाजिक अत्याचार प्रतिबंधक कृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संघर्ष सभा-सांस्कृतिक दहशतवादाची आव्हाने या विषयावर मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे, सीटूचे नेते डॉ. डी. एल. कराड आदि उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच गोविंद पानसरे यांची समाजवाद चळवळीवर भाष्य करणारी २० मिनिटांची प्रकट मुलाखत पडद्यावर दाखविण्यात आली. त्यानंतर प्रास्ताविकात डॉ. डी. एल. कराड यांनी सामाजिक चळवळींवर होणारे अत्याचार व हल्ले चिंताजनक असल्याचे सांगितले. त्यानंतर मार्गदर्शन करताना रावसाहेब कसबे म्हणाले की, अलीकडे एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की धर्म नावाच्या गोष्टीला शेवटची घर घर लागली आहे. आधी दाभोलकर व आता पानसरे यांची हत्त्या ही अशाच सामाजिक चळवळ पुढे नेणाऱ्या क्रांतिकारी विचारवंतांची हत्त्या आहे. या हत्त्यांचा शेवटपर्यंत तपास लागणार नाही. कारण या हत्त्या अत्यंत जाणीवपूर्वक करण्यात आल्या आहेत. नरेंद्र मोदींनी हिंदुत्वाच्या नव्हे, तर ओबीसीच्या कार्डवर सत्ता मिळवली असून, त्यांच्या आजूबाजूला वावरणाऱ्या लोकांचा एक छुपा अजेंडा आहे, तो लोकांना कळेलच. ज्या विचारवंताने आयुष्यभर माणसावर प्रेम केले अशा विचारवंताची हत्त्या का व्हावी.? काय सांगत होते, पानसरे की ज्यामुळे त्यांची हत्त्या झाली. ते तुम्हा आम्हाला माहित नसलेला सत्य इतिहास सांगत होते, असे कसबे यांनी सांगितले.
पानसरे यांनी डाव्या चळवळीला दलित चळवळीशी जोडण्याचा प्रयत्न केला. ज्या दिवशी डावी चळवळ दलित चळवळीला जोडली जाईल, त्या दिवशी क्रांती होईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी उत्तम कांबळे यांनीही मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन महादेव खुडे, तर आभार प्रा. डॉ. विवेक खरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी राजू देसले, दत्तू तुपे, संजय जाधव, सुनील मालुसरे, राजू नाईक आदिंनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)