ग्रामविकासाच्या पंचसुत्रीसाठी सुसंवाद महत्त्वाचा : भास्करराव पेरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 17:46 IST2019-04-28T17:45:51+5:302019-04-28T17:46:59+5:30
जळगाव नेऊर : गावातील प्रत्येकाला पिण्याचे शुद्ध पाणी मिळाले पाहिजे. गावात उपलब्ध असलेल्या पाण्याचे योग्य नियोजन करुन पाण्याचा पुनर्वापर केला पाहिजे, प्रत्येकाने वृक्ष लागवड केलीच पाहिजे, वैयक्तिक स्वच्छता या सर्व बाबी ग्रामविकासाची पंचसुत्री असून जर यात पती-पत्नीमध्ये असणाऱ्या सुसंवादासारखी भर पडली तर गाव सुखी आणि समाधानी होण्यास वेळ लागत नाही, असे प्रतिपादन राष्टÑपती पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतीचे सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी केले.

ग्रामविकासाच्या पंचसुत्रीसाठी सुसंवाद महत्त्वाचा : भास्करराव पेरे
बाळापूर येथे नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या सदस्यांच्या मार्गदर्शनासाठी उपसरपंच अंकुश शिरसाठ यांनी आयोजित केलेल्या व्याख्यानप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी समता प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अर्जुन कोकाटे होते. यावेळी पेरे यांनी आपल्या खास बोलीभाषेतून सरपंचपदाच्या २५ वर्षाच्या काळात आलेले वेगवेगळे अनुभव कथन केले. ग्रामस्थ बदल स्विकारायला तयार असतात पण त्यांना पर्याय उपलब्ध करु न दिले पाहिजेत. हे समजावून सांगतांना इथे थुंकू नका, असे फलक लावण्यापेक्षा कुठे थुंकायचे याचे फलक लावले पाहिजेत. त्या ठिकाणी वॉश बेसिन व पाण्याची सोय केली पाहिजे. तर लोक इथे-तिथे थुंकणार नाही. झाडे तोडू नका, असे अनेकांनी सांगितले, मात्र चुलीत काय घालायचे हे कुणीही सांगितले नाही. चुलीत घालायला काहीतरी पर्याय द्या. नुसत्या उपदेशांनी गाव सुधारणार नाही, तर आपल्या कृतीतुन प्रत्येकाने आपला गाव पुढे कसा जाईल, याचा विचार केला पाहिजे. पाण्याचा योग्य वापर करावा, ते वाचवण्याचा प्रयत्न करा. अखंड हरिनाम सप्ताह केल्याने पाऊस पडत नाही. त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात, असेही पेरे पाटील म्हणाले. यावेळी अण्णासाहेब पाटील, संभाजीे पवार, जनता सहकार बँकेचे संचालक माधवराव बनकर, नगरसेवक प्रवीण बनकर, पंचायत समिती सदस्य प्रवीण गायकवाड, प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे, जल हक्क संघर्ष समितीचे भागवतराव सोनवणे, डॉ. सुरेश कांबळे, बचत गटाच्या जिल्हाध्यक्ष शालिनी गायकवाड, सचिन पाटील, सदाभाऊ शेळके, विजय कोटमे, मच्छिंद्र पवार, सरपंच श्रावण खुरसणे, सोपान शिरसाठ, वत्सला पवार, अनिता शिरसाठ, विमल शिरसाठ, नारायण पवार, संगीता गायकवाड आदी सदस्यांसह मान्यवर व नागरिक ऊपस्थित होते. सूत्रसंचालन डी. पी. गायकवाड यांनी तर आभार अरु ण शिरसाठ यांनी मानले.