११० थकबाकीदारांचा पाणीपुरवठा बंद
By Admin | Updated: March 10, 2015 23:24 IST2015-03-10T23:23:57+5:302015-03-10T23:24:17+5:30
११० थकबाकीदारांचा पाणीपुरवठा बंद

११० थकबाकीदारांचा पाणीपुरवठा बंद
नाशिक : मार्चअखेर पाणीपट्टीच्या माध्यमातून सुमारे ७० कोटी रुपयांचे उद्दिष्ट गाठण्यासाठी महानगरपालिकेने बड्या थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा उगारला असून, सुमारे ५० हजारांपर्यंत थकबाकी असलेल्या ११० नळजोडणीधारकांचा पाणीपुरवठा बंद केला आहे. शहरातील एक लाख ८३ हजारपैकी सुमारे ८२ हजार नळजोडणीधारकांनी थकबाकी न भरल्याने कारवाईची मोहीम अधिक व्यापक करण्याचा निर्णय पाणीपट्टी वसुली विभागाने घेतला आहे.
महापालिकेने चालू आर्थिक वर्षात पाणीपट्टीच्या वसुलीतून ७० कोटी रुपयांचे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवले आहे. फेब्रुवारीअखेर सुमारे ३३ कोटी रुपयांची वसुली झाली असून, ३१ मार्चपर्यंत सुमारे ३७ कोटी रुपये वसुलीचे आव्हान आहे. त्यादृष्टीने महापालिकेने वसुली मोहिमेला गती दिली आहे. शहरात एक लाख ७३ हजार ४०६ नळजोडणीधारक आहेत. त्यातील सुमारे ८२ हजार नळजोडणीधारक थकबाकीदार आहेत. पहिल्या टप्प्यात महापालिकेने २५ ते ५० हजारांपर्यंत थकबाकी असलेल्या नळजोडणीधारकांवर कारवाईचा बडगा उगारला असून, आतापर्यंत ४ हजार ११८ थकबाकीदारांना येत्या ४८ तासांच्या आत थकबाकीचा भरणा करण्यासंदर्भात नोटिसा बजावल्या आहेत. सोमवारी (दि. ९) तीन हजार ५२० थकबाकीदारांना नोटिसा बजावण्यात आल्या, तर नाशिक पूर्व विभागातील १२, पश्चिम विभागातील १५, पंचवटीतील ६ आणि सातपूर विभागातील ३० थकबाकीदारांची नळजोडणी खंडित करण्यात येऊन पाणीपुरवठा बंद करण्यात आला. मंगळवारी (दि. १०) आणखी ५९८ थकबाकीदारांना नोटिसा बजावण्यात आल्या. दोन दिवसांत ११० थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. यामध्ये गृहनिर्माण सोसायट्यांचा समावेश आहे. दरम्यान, थकबाकीदारांविरुद्ध कारवाईची मोहीम अधिक व्यापक करण्यात येणार असल्याची माहिती उपआयुक्त रोहिदास बहिरम यांनी दिली.