मुक्त विचारांमुळेच संस्कृतीची जपणूक
By Admin | Updated: September 29, 2014 00:46 IST2014-09-29T00:45:46+5:302014-09-29T00:46:18+5:30
मीना वैशंपायन : जिल्हा साहित्यिक मेळाव्यात प्रकट मुलाखत

मुक्त विचारांमुळेच संस्कृतीची जपणूक
नाशिक : लेखकावर कुठलेच बंधन नसले पाहिजे. बंधनामुळे विचार मारले जातात आणि विचार गेले की संस्कृती धोक्यात येते. दुर्दैवाने आज अभिव्यक्ती स्वातंत्र्य केवळ कागदोपत्री दिसते. मुळात लेखकांनीच अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच करून घेतला आहे. स्वातंत्र्याबरोबर येणारी जबाबदारी पाळली जात नाही. मुक्त विचारानेच संस्कृतीची जपणूक होत असल्याने बिनधास्तपणे लिहा, असे स्पष्ट प्रतिपादन सार्वजनिक वाचनालयाच्या ४७ व्या जिल्हा साहित्यिक मेळाव्याच्या अध्यक्ष व ज्येष्ठ लेखक डॉ. मीना वैशंपायन यांनी प्रकट मुलाखतीत बोलताना केले.
लिमये सभागृहात आयोजित जिल्हा साहित्यिक मेळाव्यात डॉ. मीना वैशंपायन यांची मुलाखत वाचनालयाचे कार्यकारिणी सदस्य स्वानंद बेदरकर यांनी घेतली. यावेळी विविध प्रश्नांना मनमोकळेपणाने उत्तरे देताना डॉ. वैशंपायन यांनी सांगितले, संस्कृत हा माझ्या आवडीचा विषय. बालपणीच माझ्यावर भाषांचा संस्कार होत गेला. त्यामुळे दुर्गा भागवतांवर संशोधन करताना साहित्यिक दृकप्रत्ययवादाचा अभ्यास करू शकले. त्यातून दुर्गाबार्इंचाही सहवास लाभला. स्वातंत्र्य हे मूल्य मानण्याची भावना त्यांनी माझ्यात जागृत केली. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची प्राणपणाने जपणूक केली पाहिजे, याचे भान त्यांनी दिले. ज्ञानकोशकार श्रीधर व्यंकटेश केतकरांवरही मी लेखन केले. अनुवादाकडे वळले. अनुवाद ही सहजसाध्य कला नाही. त्यासाठी अपार मेहनत घ्यावी लागते. अलीकडे कथा-कादंबरीत लयबद्ध लेखन होताना दिसून येत नाही, अशी खंत व्यक्त करत वैशंपायन म्हणाल्या, कथा-कादंबरीत विषयांची सर्वसमावेशकता नाही. त्यात भावनांची, विचारांची तीव्रता यायला हवी. कथा विसर्जित केली पाहिजे असे बिलकुल वाटत नसल्याचेही वैशंपायन यांनी सांगितले. एशियाटिक लायब्ररीच्या वतीने संशोधकांसाठी नवनवीन दालने खुली करून देण्यात आली असून, तरुणांसाठी शिष्यवृत्तीच्या योजना असल्याचेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)