घोटी : मुंबई - आग्रा महामार्गाच्या विस्तारीकरणानंतर या मार्गावरील प्रवास सुखकर झाला असला तरी महामार्गालगतच्या शहरातील घनकचरा महामार्गालगत आणून टाकला जात असल्याने या महामार्गावरून दररोज प्रवास करणाऱ्या हजारो वाहनधारकांसह महामार्गाचे आरोग्यही धोक्यात आले आहे. रस्त्याच्या रुंदीकरणासाठी महामार्गालगतची झाडे तोडल्याने प्रदूषणात वाढ झालेली असताना आता महामार्गालगतच्या शहरातील कचरा महामार्गावर आणून टाकला जात असल्याने वाहनचालकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.इगतपुरी तालुक्यातील घोटी, इगतपुरी शहरासह बोरटेंभे, टाके, खंबाळे, माणिकखांब, मुंढेगाव पाडळी, गोंदे व वाडीवऱ्हे ही गावे महामार्गालगत येतात. यातील घोटी -इगतपुरी शहरासह औद्योगिक वसाहत असणाऱ्या गोंदे आणि वाडीवऱ्हे या चार गावांची लोकसंख्या व गावाचा आणि शहराचा विस्तार मोठा असल्याने स्थानिक नगरपालिका ग्रामपंचायत शहरातील घनकचरा रात्रीच्या वेळी संकलित करून घंटागाड्यांद्वारे महामार्गालगत आणून टाकतात. कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची ग्रामपंचायतीकडे कोणतीही यंत्रणा नसल्याने कचरा सडल्यानंतर प्रचंड दुर्गंधी येते. परिणामी या भागातून मार्गक्रमण करताना वाहनचालक आणि लगतच्या रहिवाशांना नाकावर रुमाल दाबून जावे लागते. घोटी शहरात चिकन विक्री करणाऱ्या दुकानातील मृत कोंबड्यांचे पिसे, अवशेष चिकन विक्रेते महामार्गावर फेकून देत असल्याने दुर्गंधी वाढत आहे.