शहराचे ‘आॅक्सिजन हब’ संकटात
By Admin | Updated: April 10, 2016 23:58 IST2016-04-10T23:27:01+5:302016-04-10T23:58:51+5:30
नेहरू वनोद्यान : विकासाकरिता वृक्षराजी धोक्यात; पावणे दोनशे झाडांवर कोसळणार कुऱ्हाड

शहराचे ‘आॅक्सिजन हब’ संकटात
नाशिक : शहराचे ‘आॅक्सिजन हब’ असलेले शासनाचे नेहरू वनोद्यान सध्या संकटात सापडले आहे. महापालिकेच्या सत्ताधारी पक्षाचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांंनी या उद्यानाच्या ‘नवनिर्माण’चा ध्यास घेतला आहे. उद्यानातील नैसर्गिक बाज सुरक्षित ठेवून वनौषधी उद्यान साकारण्याचा त्यांचा मानस जरी असला तरी विकासाच्या नावाखाली येथील वृक्षसंपदेला धोका निर्माण झाला आहे. वनोद्यानामधून पांडवलेणी डोंगराच्या पायथ्याशी तयार केला जाणारा पदपथ हा विकासाचा नव्हे तर पर्यावरणाच्या ऱ्हासाला कारणीभूत असणारा मार्ग ठरू शकतो. कारण यासाठी १७५ झाडे तोडण्याचा प्रस्ताव पालिकेने मांडला आहे. त्यामुळे शहरातील पर्यावरणप्रेमींनी संताप व्यक्त क रत या कामावर आक्षेप घेतला आहे.
एकीकडे शासन पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यभर कोट्यवधी रोपांच्या लागवडीची तयारी करत असताना दुसरीकडे शासनाच्याच वनोद्यानातील वृक्षराजी धोक्यात आल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. वनोद्यानात महापालिका, वनविकास महामंडळ व टाटा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने वनऔषधी उद्यानासह पर्यटकांच्या मनोरंजनासाठी विविध विकासकामे केली जाणार आहेत. सद्यस्थितीत मोठ्या संख्येने येथे भारतीय प्रजातीची वनौषधी असून डेरेदार वृक्षराजीमुळे शहराच्या एका दिशेने विकसित जंगलाचे अस्तित्व आहे. अंबड औद्योगिक वसाहत, पालिकेचे खतप्रकल्प केंद्र यामुळे जणू शहरात पसरणारी प्रदूषित हवा हे जंगल नैसर्गिकरीत्या शुद्ध करून पुढे पाठविण्याचे काम करत आहे. ताणतणावाच्या जीवनशैलीतून आल्हाददायक वातावरणाची अनुभूती घेण्यासाठी नाशिककरांना हे जवळचे हक्काचे ठिकाण आहे. ‘वीकेण्ड’ला नाशिककर ‘फ्रेश’ होण्यासाठी निसर्गाच्या सान्निध्यात या ठिकाणी आवर्जून हजेरी लावतात.
त्यामुळे पर्यटकांचा ओघ उद्यानाकडे कमी आहे असे म्हणणे चुकीचे ठरेल. निसर्गाच्या सान्निध्यात वनभ्रमंतीची मजा आजही पर्यटक तितक्याच आनंदाने लुटत आहे; मात्र तरीदेखील या उद्यानामध्ये मातीच्या पायवाटांऐवजी जर पेव्हर ब्लॉक टाकून किंवा पदपथ, सायकल ट्रॅक तयार करून राज यांना ‘बॉटनिकल गार्डन’चे नवनिर्माण करायचे असल्याने या वनोद्यानात सध्या पर्यटकांना येणारा वनभ्रमंतीच्या अनुभवाला मुकावे लागण्याची शक्यता आहे.