सिडकोत अखेर दूषित पाणी झाले स्वच्छ
By Admin | Updated: August 25, 2016 00:12 IST2016-08-25T00:11:56+5:302016-08-25T00:12:11+5:30
पालिकेला आली जाग : काही ठिकाणी अजूनही गढूळ पाणीपुरवठा

सिडकोत अखेर दूषित पाणी झाले स्वच्छ
सिडको : गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण सिडको भागात दूषित व दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात होता, परंतु यानंतर उशिराने का होईना महापालिकेस जाग आली व त्यांनी पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. यात सिडकोतील काही भागात आज स्वच्छ तर काही भागात मात्र
अद्यापही दूषित पाणीपुरवठा होत असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.
सिडको भागात गेल्या काही दिवसांपासून साबणाचा वास असलेला व दूषित पाणीपुरवठा होत होता. यामुळे अनेकांना पोटदुखी तसेच उलट्या होत असल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत मनपास कळवूनही दखल घेतली जात नसल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. यानंतर पाणीपुरवठा त्वरित सुरळीत करण्याचे आदेशही सिडको प्रभाग सभापती अश्विनी बोरस्ते यांनी अधिकाऱ्यांना दिले होते. पाणीपुरवठा सुरळीत असला तरी केवळ पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे सिडकोत नेहमीच पाणीपुरवठ्याबाबत ओरड असते.
गेल्या चार ते पाच दिवसांपासून सिडकोतील राणाप्रताप चौक, दत्त चौक, गणेश चौक, विजयनगर, औदुंबर स्टॉप परिसर, तुळजाभवानी चौक, शुभम पार्क परिसर, उपेंद्रनगर यांसह संपूर्ण सिडको भागातच दूषित व दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत होता. दरम्यान, याबाबत आज मनपा सिडको पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख संजय बच्छाव यांनी दखल घेतली. यात पाण्यात देण्यात येणारा तुरटीचा डोस बदलण्यात आला. यामुळे आज सिडको भागातील पाणीपुरवठा सुरळीत झाला असल्याचे मनपाकडून सांगण्यात येत असले तरी अजूनही काही भागात मात्र गढूळ पाणीपुरवठा होत असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले आहे. (वार्ताहर)