शाळांच्या अंगणात पुन्हा किलबिलाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:43 IST2021-02-05T05:43:29+5:302021-02-05T05:43:29+5:30
नाशिक : गेल्या दहा महिन्यांपासून बंद असलेल्या शाळा बुधवारपासून पुन्हा सुरू झाल्या आणि प्रदीर्घ कालावधीनंतर शाळांच्या परिसरात मुलांचा किलबिलाट ...

शाळांच्या अंगणात पुन्हा किलबिलाट
नाशिक : गेल्या दहा महिन्यांपासून बंद असलेल्या शाळा बुधवारपासून पुन्हा सुरू झाल्या आणि प्रदीर्घ कालावधीनंतर शाळांच्या परिसरात मुलांचा किलबिलाट ऐकू आला. गेल्या अ्रनेक महिन्यांपासून शाळेत येऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना अखेर प्रत्यक्ष नव्या वर्गात बसण्याचा योग आल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंदही सहज दिसत होता. शिक्षकांनी शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचे वाजत गाजत कुठे औक्षण तर कुठे फेटे बांधून स्वागत केले. सजलेल्या शाळा, रांगोळीचे आंगण, पानाफुलांची सजावट, फुग्यांचे प्रवेशद्वार अशा वातावरणात प्राथमिक शाळांमध्ये जणू प्रवेशाचा उत्सवच सुरू होता.
कोरोना संक्रमणाच्या कालावधीपासून बंद असलेल्या शाळा टप्प्याटप्प्याने सुरू होत आहे. नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाल्यानंतर काही दिवसात क्लासेसही सुरू झाले होते. आता बुधवारपासून इयत्ता पाचवी ते सातवीच्या वर्गात चिमुकल्यांनी नव्या वर्षात पाऊल ठेवले. कोरोनामुळे गत वर्षात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना नव्या वर्गात बसण्याचा योग आला नव्हता. परंतु आता शासनाच्या आदेशानंतर इयत्ता पाचवती ते आठवीचे वर्ग सुरू झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसून आला. गेल्या दहा महिन्यांच्या कालावधीनंतर शाळेत मुले येणार असल्याने शाळांनी विद्यार्थ्यांचे अभिनव पद्धतीने स्वागत केले. सातपूरच्या शाळेत विद्यार्थ्यांना फेटे बांधून त्यांचे मराठमोळ्या पद्धतीने स्वागत केेले. काही शाळांमध्ये मुलांचे औक्षण करण्यात आले तर काही ठिकाण ढोल ताशे देखील लावण्यात आले होते.
विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी केेलल्या उपायोजनांवरून शाळा सुरू झाल्याचा उत्साह शिक्षकांच्या चेहऱ्यावरही दिसत होता. शाळेत आलेले विद्यार्थी देखील आपल्या शिक्षकांना आवर्जून भेटत असल्याचे चित्र दिसत होते. पालकांमध्ये काहीसी चिंता असल्याने त्यांच्याकडून अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. शाळा सुटेपर्यंत अनेक पालक शाळांमध्ये बसून होते. अर्थात पहिला दिवस असल्याने सध्या तरी शालेय वाहतूक सुरू झालेली नव्हती.
कोरेानोचा प्रभाव काही प्रमाणात कमी झाला असला तरी संकट कायम असल्याने शाळांकडून कमालीची दक्षता घेण्यात आली हेाती. शाळेत येणाऱ्या प्रत्येक मुलांचे सॅनिटायझेशन, थर्मल टेंपरेचरने तपासणी करण्यात आली. सर्वच मुलांना रोज बोलविले जाणार नसल्याने विद्यार्थ्यांची संख्या कमी होती. एका बाकावर एक याप्रमाणेच विद्यार्थ्यांना बसविण्यात आले. शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी देखील पुरेपूर काळजी घेतली असल्याचे दिसून आले. मास्कशिवाय शाळांच्या आवारात कुणालाही परवानगी देण्यात आली नव्हती.