चिमुकल्यांनी अभिनयकलेचे दर्शन घडवत मानवी प्रवृत्तीवर भाष्य केले,
By Admin | Updated: December 28, 2014 01:53 IST2014-12-28T01:50:17+5:302014-12-28T01:53:28+5:30
चिमुकल्यांनी अभिनयकलेचे दर्शन घडवत मानवी प्रवृत्तीवर भाष्य केले,

चिमुकल्यांनी अभिनयकलेचे दर्शन घडवत मानवी प्रवृत्तीवर भाष्य केले,
नाशिक : शहरातील परशुराम साईखेडकर नाट्यगृहात सुरू असलेल्या राज्य बालनाट्य स्पर्धेत शनिवारी सादर झालेल्या पाच नाटकांतून चिमुकल्यांनी आपल्यातील अभिनयकलेचे दर्शन घडवत उपहास, विडंबनातून मानवी प्रवृत्तीवर भाष्य केले, तसेच एकतेचा संदेशही दिला. प्रारंभी जळगावच्या ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयाने उज्ज्वला गाढे दिग्दर्शित ‘अंधेरनगरी’ नाटक सादर केले. दुसऱ्यांवर विसंबून राहणाऱ्या वेंधळ्या राजाची गोष्ट त्यातून सादर करण्यात आली. दर्शना रडे, प्राची पाटील, फाल्गुनी चौधरी, अश्विनी देवरे आदिंनी भूमिका साकारल्या. नाशिकच्या क्रांतिवीर मित्रमंडळाच्या वतीने ‘शेपटीचा साप’ हे सई परांजपे लिखित आणि राहुल मनोहर दिग्दर्शित नाटक सादर करण्यात आले. यात राजा-राणीच्या गोष्टीतून माणसाच्या वृत्तीवर विडंबनात्मक शैलीने प्रकाश टाकण्यात आला. सिद्धेश पराडकर, अंकिता दीक्षित, सिद्धांत आंबेकर, अमित थेटे, प्रबुद्ध मागाडे, वंदन वेलदे आदिंनी प्रमुख भूमिका केल्या. अहमदनगरच्या जामखेड येथील नवीन मराठी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी ‘वेताळ रिटर्न’ हे नाटक सादर केले. साक्षी काळदाते, शुभम वस्तारे, विठ्ठल पाटील, अनिकेत लाटगे आदिंनी भूमिका केल्या. अविनाश बोधले यांचे दिग्दर्शन होते. भुसावळच्या महाराणा प्रताप विद्यालयाने ‘वीर जवान अमर रहें’ या नाटकातून एकतेचा संदेश दिला. नारायण घोडके दिग्दर्शित या नाटकात नंदकिशोर गोसावी, अभिजित सोनवणे, प्रतीक मुळे, सार्थक जाधव, प्रीतेश वरखेडे आदिंनी भूमिका केल्या. जुन्या सिडकोतील मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमिक विद्यालयाने प्रशांत दळवी लिखित ‘दे दणादण’ या नाटकातून खेळाच्या मैदानासाठी मुलांनी राजकीय नेत्यांशी केलेल्या संघर्षाचे चित्रण केले. दर्शन उशीरे, ऋषभ निकम, निशांत देशपांडे, पूजा पाटील, यश ढाके, वैष्णवी मुर्तडक यांनी प्रमुख भूमिका केल्या. दिग्दर्शन डॉ. प्रशांत वाघ यांचे होते. (प्रतिनिधी)