चीट फंड कंपन्यांकडे राज्य शासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष
By Admin | Updated: July 29, 2014 00:56 IST2014-07-29T00:07:49+5:302014-07-29T00:56:35+5:30
किरीट सोेमय्या : केबीसीबाबत पोलीस आयुक्तांशी चर्चा

चीट फंड कंपन्यांकडे राज्य शासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष
नाशिक : केबीसीबरोबरच चीट फं ड कंपन्यांमध्ये राज्यातील दहा लाख नागरिकांनी ५० हजार कोटींपेक्षा अधिक पैसे गुंतवले आहेत़ अशा ४१ चीट फं ड कंपन्यांची यादी व अहवाल आपण मुख्यमंत्री तसेच गृहमंत्र्यांना दिला आहे़ परंतु त्याबाबत राज्य शासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे.पश्चिम बंगालनंतर महाराष्ट्र हा चीट फंड कंपन्यांचा बालेकिल्ला झाला असल्याचा आरोप भाजपाचे खासदार किरीट सोमय्या यांनी येथे केला़
केबीसी फसवणूक प्रकरणी किरीट सोमय्या यांनी नाशिक पोलीस आयुक्तांची भेट घेऊन माहिती घेतली़ यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते़ चीट फंड कंपन्यांबाबत आपण राज्य शासनाला उच्च न्यायालय तसेच सीबीआयचा अहवाल दिला होता़ मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांशी बोलूनही याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला. केबीसीमध्ये हजारो नागरिकांची
फ सवणूक झाली आहे़
यातील सर्व गुंतवणूकदारांचे संरक्षण व पैसे परत मिळवून देण्याचे आपले मुख्य उद्दिष्ट आहे़ केबीसी प्रकरणावर नाशिक पोलिसांनी चांगली पकड घेतली आहे़ या कंपनीतील अनेक मुख्य मोहरे जेरबंद करण्यात त्यांना यश आले आहे़ उर्वरितांचा सहभाग निष्पन्न झाल्यावर त्यांच्यावरही कारवाई करण्यात येणार आहे़ आयुक्तांशी चर्चा करून आतापर्यंतच्या कारवाईचा आढावा घेतला.परदेशातील आरोपी पकडण्याबाबत जी काही मदत लागेल त्यासाठी आपण केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
नाशिक पोलिसांनी अगोदर माहिती मिळूनही यामध्ये हलगर्जीपणा केला असे वाटते का, असे विचारले असता ‘देर आये दुरुस्त आये’ म्हणत हा विषय त्यांनी टाळला़
याप्रसंगी भाजपाचे शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी, प्रदेश उपाध्यक्ष सुहास फ रांदे, विजय साने, नगरसेवक देवयानी फरांदे, सीमा हिरे, सुरेश पाटील, गोपाळ पाटील यांसह केबीसी गुंतवणूकदार उपस्थित होते़ (प्रतिनिधी)