नाव बदलणे आता झाले सोपे
By Admin | Updated: July 28, 2014 23:29 IST2014-07-28T22:40:24+5:302014-07-28T23:29:19+5:30
नाव बदलणे आता झाले सोपे

नाव बदलणे आता झाले सोपे
विंचूर : नावात काय आहे असे शेक्सपिअर म्हणून गेला आहे. पण हे म्हणताना शेक्सपिअरचे नाव मात्र घ्यावेच लागते. सर्वसाधारणत: विवाहानंतर नाव बदलले जाते. मात्र प्रॉपर्टीसाठी, अंकशास्त्राच्या नियमाप्रमाणे किंवा नाव आवडत
नाही म्हणून नाव बदलणाऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे. नाव, आडनाव, आणि धर्म बदलण्याच्या पूर्वीच्या किचकट आणि वेळखाऊ पद्धतीत आता बदल करण्यात आला असून, सदर प्रक्रिया आॅनलाइन करण्यात आली आहे. नाव बदलण्याबाबतच्या जाहिराती शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध करण्यासाठीची छापील अर्जाची पद्धत संपुष्टात आली असून, आॅनलाइन पद्धतीमुळे हा त्रास निश्चितपणे कमी होणार असल्याने नाव कट करण्याची कटकट कमी होणार आहे.
मुद्रण व लेखनसामग्री संचालनालयामार्फत साधारण व असाधारण अशा ३२ प्रकारचे राजपत्र छपाई करून प्रसिद्ध केली जातात. त्यापैकी नागरिकांना नाव, धर्म व जन्मतारीख बदलाबाबतचे जाहिरातीचे राजपत्र भाग दोनमध्ये छपाई केली जाते. त्यासाठी नागरिकांना संचालनालयाच्या खिडकीवर रांग लावून अर्ज प्राप्त करुन अर्ज भरुन सादर करावे लागत होते. शासन राजपत्रही आॅनलाइन प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
लग्न झाल्यावर नाव बदलणे किंवा दाखल्यावरील जन्मतारीख बदलणे यासाठी शासकीय मुद्रण व लेखनसामग्री संचालनालयात जाऊन अर्ज करावा लागतो. शासनपत्रात
ते प्रसिद्ध करून घेण्याची पद्धत होती. ही प्रक्रिया वेळखाऊ व किचकट होती. मात्र ही प्रक्रिया यापुढे
आता आॅनलाइन पद्धतीने राहणार असून, त्यासाठीचे शुल्कदेखील आॅनलाइन पद्धतीने भरण्याची सोय शासनाने करून दिली आहे. या सुविधेचा लाभ घेता यावा म्हणून अर्ज भरताना पासपोर्ट, वाहनचालक परवाना, मतदान ओळखपत्र, पॅनकार्ड, आधारकार्ड यापैकी कुठल्याही एकाची प्रत स्कॅन करून जोडावी लागणार आहे.(वार्ताहर)