सेनेपुढे बालेकिल्ला राखण्याचे आव्हान
By Admin | Updated: January 15, 2017 00:30 IST2017-01-15T00:30:30+5:302017-01-15T00:30:40+5:30
मनसेवर उमेदवार शोधण्याची वेळ : दुरंगी लढत होण्याची शक्यता, इच्छुकांमध्ये चढाओढ

सेनेपुढे बालेकिल्ला राखण्याचे आव्हान
गणेश धुरी नाशिक
गेल्या दोन पंचवार्षिक निवडणुकांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ताब्यात असलेला एकलहरा गट या पंचवार्षिकमध्ये टिकविणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी अवघड होऊन बसले आहे. कारण ज्या दोन पंचवार्षिकमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा परिषद सदस्य निवडून आले ते खासदार हेमंत गोडसे यंदा शिवसेनेत असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला या गटातून नेतृत्व व उमेदवार शोधण्याची वेळ आली
आहे.
एकलहरा गटाचे राजकारण संसरी गावाभोवती फिरत असल्याचा इतिहास आहे. पारंपरिक शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणार हा गट गेल्या दोन पंचवार्षिकपासून आजी-माजी खासदार गोडसे द्वयींमुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ताब्यात राहिला आहे. यंदा मात्र हा गट शिवसेना परत मिळविण्यासाठी आटोकाट प्रयत्न करेल, हे नक्की.
एकलहरा गटावर माजी मंत्री बबनराव घोलप यांच्यासह आजी-माजी खासदारांचे प्रभुत्व आहे. खासदार हेमंत गोडसे, माजी खासदार राजाभाऊ गोडसे यांच्याबरोबरच शिवसेना जिल्हाप्रुमख विजय करंजकर, राजाराम धनवटे, अनंत जगताप, भगवान जुंद्रे, प्रा. ज्ञानेश्वर गायकवाड, शंकर धनवटे, नितीन जगताप, बाळासाहेब म्हस्के, प्रकाश म्हस्के यांचे नेतृत्व मानले जाते.
आता गटाचे आरक्षण नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित झाला आहे. या गटात शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी व कॉँग्रेस यांच्यात चौरंगी लढतीची शक्यता वर्तविली जात असली तरी या गटाचा
इतिहास पाहता यंदाची लढत दुरंगीच होईल, असे बोलले जाते.