घरफोड्यांच्या टोळीचे पोलिसांसमोर आव्हान
By Admin | Updated: November 19, 2015 22:41 IST2015-11-19T22:40:34+5:302015-11-19T22:41:18+5:30
नागरिक भयभीत : शहरात विविध ठिकाणी घरफोडी सत्र सुरूच

घरफोड्यांच्या टोळीचे पोलिसांसमोर आव्हान
पंचवटी : पंचवटी, तसेच आडगाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून भुरट्या चोऱ्या, सोनसाखळी चोरांपाठोपाठ आता घरफोड्या करणाऱ्या टोळीने डोके वर काढल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यात तर चोरट्यांनी कळस गाठत पोलिसांसमोर आव्हान उभे केले होते. बोटावर मोजण्याइतपत दोन-चार चोरट्यांना जेरबंद करण्यात यश मिळाले; मात्र त्यानंतर पोलिसांची गस्त कमी झाली आणि गुन्ह्यांची उकलही कमी होत असल्याचे दिसून येत आहे.
आडगाव तसेच पंचवटी परिसरातील नागरिक दिवाळीच्या सुटीनिमित्त घराबाहेर पडल्याची संधी साधून अनेकांच्या घरी दिवसा, तर काहींच्या रात्रीच्या सुमारास कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी घरफोडी केल्याची घटना उघडकीस आली आहे. पंचवटी परिसरात दर दोन- चार दिवसाआड घरफोडीच्या घटना घडत असल्याने गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात गुन्हे शोध पथकाला अपयश येत असल्याचे बोलले जात आहे.
एकीकडे गुन्हे कमी झाल्याचा दावा पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून केला जात असला तरी दुसरीकडे मात्र गुन्ह्यांचे सत्र वाढतच चालल्याने पोलिसांचीही डोकेदुखी वाढल्याची कबुली खुद्द पोलीस कर्मचारीच देत आहेत. पंचवटी तसेच आडगाव परिसरात घरफोडीच्या घटना घडत असतानाही पोलिसांच्या हाती चोरटे लागत नसल्याने सध्या तरी गुन्हेगार मोकाटच असल्याचे दिसून येते. गेल्या काही दिवसांपासून शहरात वाढलेल्या गुन्हेगारी, तसेच घरफोड्यांच्या घटनांमुळे पोलिसांचा गुन्हेगारांवरील वचक कमी झाल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. (वार्ताहर)