बहुजन समाजापुढे धर्मांध शक्तींचे आव्हान
By Admin | Updated: June 8, 2015 01:32 IST2015-06-08T00:08:00+5:302015-06-08T01:32:50+5:30
राज्यातील आंबेडकरी चळवळीत सध्या मोठी पोकळी निर्माण झाली असून, प्रस्थापित नेतेमंडळी आंबेडकरांच्या विचारांऐवजी केवळ सत्तेच्या शोधात आहेत.

बहुजन समाजापुढे धर्मांध शक्तींचे आव्हान
नाशिक : राज्यातील आंबेडकरी चळवळीत सध्या मोठी पोकळी निर्माण झाली असून, प्रस्थापित नेतेमंडळी आंबेडकरांच्या विचारांऐवजी केवळ सत्तेच्या शोधात आहेत. त्यामुळे संपूर्ण आंबेडकरी चळवळीच्याच पुनर्बांधणीचे आव्हान बहुजन समाजापुढे उभे आहे. याशिवाय धर्मांध शक्तींमुळे जातिविरहित व समताधिष्ठित समाज निर्मितीच्या ध्येयात अडथळा निर्माण झाल्याची टीका बसपाचे राष्ट्रीय महासचिव तथा आंबेडकरी विचारवंत अॅड. सुरेश माने यांनी केली.
येथील परिवर्तन युवक अभियानाच्या वतीने आयोजित ‘बहुजन समाजापुढील सामाजिक व राजकीय आव्हाने’ या विषयावरील जाहीर व्याख्यानात अॅड. माने बोलत होते. परशुराम साईखेडकर नाट्यगृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. सुनीता खरे होत्या. बसपाचे प्रदेश सचिव प्रकाश अहिरे, दिनेश कटारे, जयमंगल धनराज, राजू दाहिजे, यशवंत सपकाळे, संजय सूर्यवंशी, बाळासाहेब निकम, शिवदास म्हसदे, उषा अहिरे आदि विचारमंचावर उपस्थित होते. यावेळी अॅड. माने म्हणाले, देशात सत्ताबदलानंतर धर्मांध शक्तींचे पुनरुज्जीवन झाले असून, त्यामुळे समताधिष्ठित समाजनिर्मितीपुढे मोठे आव्हान उभे आहे. आंबेडकरांच्या १२५व्या जयंतीनिमित्त त्यांना ‘हायजॅक’ करण्याचा कॉँग्रेस व भाजपाकडून प्रयत्न झाला. लोकांनी काय खावे, कोणत्या धर्माचे आचरण करावे, हे सरकारने सांगू नये. विकासाच्या मुद्द्यावर निवडून आलेल्या सरकारला विदर्भ व मराठवाड्याचा अनुशेष भरून काढता आलेला नाही. ३५० लाख कोटींच्या कर्जात बुडालेल्या महाराष्ट्रात शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळू शकत नाही. नोकरभरती बंद असून, ३५ लाख बेरोजगार तरुणांची फौज कामाच्या शोधात आहे. महाराष्ट्राच्या या दयनीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ‘व्यापक परिवर्तनासाठी राजकारण’ या भूमिकेचा अवलंब करीत फुले-शाहू-आंबेडकर चळवळीची युवकांच्या सहाय्याने पुनर्बांधणी करणार असून, वेळ पडल्यास जनआंदोलनही छेडण्याचा इशारा अॅड. माने यांनी दिला. आरक्षणाच्या मुद्द्यावर विनाकारण धनगर व आदिवासी, कुणबी व मराठा यांच्यात वाद निर्माण करणाऱ्यांवरही त्यांनी टीका केली. संतोष सरकटे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. प्रसाद निकाळे, हेमंत तपासे आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)