केंद्र सरकारच राम मंदिरासाठी कायदा करेल : तोगडिया

By Admin | Updated: April 29, 2016 23:38 IST2016-04-29T23:32:18+5:302016-04-29T23:38:56+5:30

केंद्र सरकारच राम मंदिरासाठी कायदा करेल : तोगडिया

Center will make law for Ram temple: Togadia | केंद्र सरकारच राम मंदिरासाठी कायदा करेल : तोगडिया

केंद्र सरकारच राम मंदिरासाठी कायदा करेल : तोगडिया

 नाशिक : अयोध्येत राम मंदिर बांधण्यासाठी संसदेत कायदा करण्याचे वचन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी जाहीरनाम्यात दिले होते. त्यामुळे आता केंद्रात भाजपाची सत्ता असल्याने मोदी कायदा करतीलच कारण ते वचनाला पक्के आहेत, असे सांगत विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया यांनी मंदिराचा मुद्दा आता सरकारच्या कोर्टात टाकला आहे. महिलांच्या मंदिर प्रवेशाबाबतही परंपरेचे समर्थन करताना त्यांनी परंपरा बदलताही येईल परंतु त्यासाठी कोणी दंडुका घेऊन हिंदूंना शिकवू नये, असा सल्लाही दिला आहे.
विश्व हिंदू परिषदेच्या वतीने इंडिया हेल्थ लाइनचा शुभारंभ करण्यासाठी तोगडिया नाशिकमध्ये आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना राम मंदिराविषयी भूमिका मांडली. अयोध्येत राम मंदिर होणारच; मात्र त्यासाठी संसदेत कायदा होणे महत्त्वाचे आहे. १९८७ मध्ये हिमाचल प्रदेश येथे आयोजित भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत संसदेत कायदा करूनच राम मंदिर बांधावे, असा ठराव करण्यात आला होता. (पान ७ वर)


त्यानंतर गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या जाहीरनाम्यात राम मंदिर बांधण्याचा कायदा संसदेमध्ये करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते आणि नरेंद्रभाई मोदी वचन पाळण्यात पक्के असल्याने ते कायदा करतीलच, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, कायदा करण्यासाठी विश्व हिंदू परिषद दबाव आणणार काय, यावर मात्र त्यांनी दबाव टाकण्याचे काम जाहीर करून केले जात नाही असेही स्पष्ट केले.
सध्या महिलांना मंदिरात आणि गर्भगृहात प्रवेश देण्याच्या विषयावरून सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तोगडिया यांनी परंपरेचे समर्थन केले. आपल्याकडे मंदिरात प्रवेश देण्याबाबत काही परंपरा असून त्या शेकडो वर्षांपूर्वीच्या आहेत. अनेक ठिकाणी पुरुषांना मंदिरात प्रवेशास मनाई आहे. या परंपरा बदलू शकत नाही असे नाही. बाल विवाह, विधवा विवाह बंदी या प्रथा सुजाण हिंदूंनी बदलल्याच आहेत. आताही परंपरा बदलायच्या ठरल्यास स्थानिक हिंदू त्याबाबत निर्णय घेतील, असेही ते म्हणाले.
..इन्फो..
मूर्तीचे दर्शन महत्त्वाचे
सोमनाथ मंदिरासाठी माझ्या पूर्वजांनी लढा दिला आहे परंतु तेथे मंदिराच्या गाभाऱ्यात मला प्रवेश मिळत नाही. नाशिकमध्ये मात्र आज मी गाभाऱ्यात बसून पूजा केली, अशा प्रकारच्या प्रत्येक ठिकाणच्या परंपरा वेगळ्या आहेत. मूर्तीचे दर्शन महत्त्वाचे आहे. ते कुठूनही घ्या, असे सांगून त्यांनी देव आशीर्वाद देताना जात, लिंगभेद पाळत नाही असेही सांगितले.

Web Title: Center will make law for Ram temple: Togadia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.