ग्रामस्थांना दिले जातात कॅशलेस व्यवहाराचे धडे

By Admin | Updated: January 9, 2017 01:01 IST2017-01-09T01:01:03+5:302017-01-09T01:01:17+5:30

येवला : तालुक्यात जिल्हा बँकेच्या पुढाकारातून जनजागृती

Cashless transaction lessons are given to the villagers | ग्रामस्थांना दिले जातात कॅशलेस व्यवहाराचे धडे

ग्रामस्थांना दिले जातात कॅशलेस व्यवहाराचे धडे


येवला : आर्थिक व्यवहारांची पद्धत बदलली असली तरी आजही नागरिकांमध्ये नव्या पद्धतीविषयी अज्ञान आहे. भविष्यात अनेक व्यवहार आॅनलाइन होणार असल्याने याची माहिती ग्रामीण भागातील नागरिक व शेतकऱ्यांना व्हावी या हेतूने जिल्हा बँकेने कॅशलेस व्यवहार कशा पद्धतीने पार पाडले जातात याची सविस्तर माहिती देण्यासाठी तालुक्यात कॅशलेस व्यवहार साक्षरता मार्गदर्शन सुरू केले आहे. या अंतर्गत मातोश्री तंत्रनिकेतनचे प्राचार्य गीतेश गुजराथी गावोगावी प्रात्यक्षिके दाखवत नागरिकांना माहिती करून देत आहेत.
जिल्हा बँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे व संचालक किशोर दराडे यांच्या पुढाकारातून येथील विभागीय कार्यालयाने मोठ्या लोकसंख्या असलेल्या १९ गावांमध्ये या डिजिटल साक्षरता शिबिराचे आयोजन केले आहे.
आत्तापर्यंत अनकाई, सावरगाव, रहाडी, गवंडगाव, अंदरसूल, मुखेड, जळगाव नेऊर व देशमाने या गावांमध्ये कॅशलेस साक्षरता कार्यशाळा झाली आहे. शेतकरी व व्यावसायिकांनीही या उपक्रमास भरभरून प्रतिसाद दिला आहे. प्रा. गुजराथी विविध चित्रफितींच्या माध्यमातून मार्गदर्शन करीत आहेत.
आगामी काळात कॅशलेस व्यवहार शिकणे हे प्रत्येकासाठी गरजेचे आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचा मोबदलासुद्धा आता धनादेशाच्या रूपातच मिळणार आहे, तर बी-बियाणे आणि खते आदिंची खरेदीसुद्धा पीओएसच्या माध्यमातून करावी लागणार आहे. त्यामुळे कॅशलेस व्यवहार प्रत्येकाने शिकणे ही काळाची गरज असल्याचे प्रा. गुजराथी शेतकऱ्यांना पटवून देत आहेत. या शिबिरात कॅशलेस व्यवहाराकरिता शासनाने उपलब्ध करून दिलेल्या चित्रफीत तसेच सादरीकरणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कॅशलेस व्यवहाराचे महत्त्व पटवून दिले. प्रा. गुजराथी यांनी आपल्या खात्यातून आॅनलाइन पैसे दुसऱ्याला पाठवणे, केलेल्या व्यवहारांची माहिती घेणे, बॅँक स्टेटमेंट काढणे, मोबाइल बिल, लाइट बिल, इन्शुरन्स प्रीमियम, सुटीच्या दिवशी किंवा बँक बंद असताना व्यवहार कसे करायचे, त्याचे फायदे कोणते, अडचणीच्या काळात मोबाइल बँकिंग कशी महत्त्वाची ठरते, या माध्यमातून साध्या मोबाइलवरून व्यवहार कसे करावे, रोखीच्या व्यवहाराचे तोटे व त्यावर कॅशलेस व्यवहाराचे फायदे, एटीएमद्वारे पैसे काढणे, स्वाइप व पीओएस मशीनचा वापर करणे, विविध मोबाइल अ‍ॅपचा उपयोग करणे याची प्रात्यक्षिके दाखवत सविस्तर माहिती दिली. आॅनलाइन तसेच मोबाइल बॅँकिंग व्यवहार करताना सुरक्षेच्या दृष्टीने कोणती काळजी घ्यावी याविषयीसुद्धा ते मार्गदर्शन करत आहेत. बँकेचे विभागीय अधिकारी एस. एस. पैठणकर, जिल्हा बँकेचे अधिकारी प्रवीण तनपुरे, बी. के. कदम, मातोश्री पॉलिटेक्निकचे प्रा. वैभव धांडे, ज्ञानेश्वर वाघ व वैभव कानडे संयोजन करत आहेत. दरम्यान, मंगळवारी धूळगाव, पाटोदा, आडगाव रेपाळ येथे, तर बुधवारी कुसमाडी, नगरसूल, राजापूर येथे, निमगाव मढ, महालखेडा व येवला येथे साक्षरता शिबिर घेण्याचे नियोजन आहे. (वार्ताहर)

Web Title: Cashless transaction lessons are given to the villagers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.