पावसाअभावी रोपे जळण्याच्या स्थितीत
By Admin | Updated: June 27, 2014 00:10 IST2014-06-26T21:35:50+5:302014-06-27T00:10:45+5:30
पावसाअभावी रोपे जळण्याच्या स्थितीत

पावसाअभावी रोपे जळण्याच्या स्थितीत
हरसूल : त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या पूर्वभागात वाघेरा ते गुजरात हद्दीपर्यंत सध्या अपुऱ्या पावसामुळे पिके जळण्याच्या स्थितीत असून, आधीच आर्थिक संकटांनी मेटाकुटीस आलेल्या बळीराजापुढे दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. मागील वर्षी भाताची हातातोंडाशी आलेली उभी पिके फक्त चार ते पाच दिवसांत तुडतुड्याने उद्ध्वस्त केल्याने या भागातील शेतकरी हैराण झाले होते.
यावर्षी मोठ्या आशेने खरिपाची तयारी केली. भाताबरोबर नागली, वरई, भुईमूग पिकांच्या पेरण्या केल्या. असे असताना अचानक पावसाने पाठ फिरवल्याने बिकट परिस्थिती ओढावली आहे. हरसूल परिसरातील भात उत्पादकांची अडचण समजून घेण्यासाठी शासनाकडे वेळ नाही किंवा त्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात आहे का, असा सवाल आता शेतकरी करत आहे. कारण द्राक्ष असो किंवा ऊस अशा पिकासाठी सरकार तत्परतेने पाऊल उचलून उपाययोजना करते. खरिपाच्या सुरुवातीला भात पिकवणाऱ्या बळीराजाला अडचणीत टाकणाऱ्या वरुणराजाला दोषी ठरवावे का, रयतेच्या राजाला (शासनाला) असा उद्विग्न सवाल बळीराजा करत आहे.