सुशिक्षितच नव्हे सुसंस्कृत नागरिक घडवा
By Admin | Updated: September 5, 2015 22:28 IST2015-09-05T22:27:31+5:302015-09-05T22:28:00+5:30
छगन भुजबळ : आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण

सुशिक्षितच नव्हे सुसंस्कृत नागरिक घडवा
नाशिक : समाजात आईनंतर आदराचे स्थान मुलांमध्ये गुरूजनांबद्दल असते. मात्र त्यांना आजही अपेक्षित मानसन्मान मिळालेला नाही, हे दुर्दैव आहे. समाज घडविण्याचे काम करणाऱ्या शिक्षकांनी केवळ सुशिक्षित नव्हे, तर सुसंस्कृत नागरिक घडविले पाहिजेत, असे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री आमदार छगन भुजबळ यांनी
केले.
जिल्हा परिषदेच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण फ्रावशी अकॅडमी येथील सभागृहात झाले. यावेळी व्यासपीठावर जि. प. अध्यक्ष विजयश्री चुंबळे, सभापती किरण थोरे, उषा बच्छाव, केदा अहेर, शोभा डोखळे, मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर, जि. प. सदस्य रवींद्र देवरे, संगीता ढगे, सुनीता पाटील, प्रा. अशोक जाधव, गोरख बोडके, शिक्षणाधिकारी रहीम मोगल, नवनाथ औताडे, रायुकॉँ शहराध्यक्ष अंबादास खैरे, छबू नागरे आदि उपस्थित होते.
छगन भुजबळ पुढे म्हणाले की, आजही देशात शिक्षणाच्या दर्जाबाबत ओरड आहे. शिक्षकांना देशात मानसन्मान मिळत नाही. मंत्रीसुद्धा खाते निवडताना शिक्षणखाते शेवटी मागतात. मात्र परदेशात नेमके याउलट परिस्थिती आहे.
काही देशात पंतप्रधानानंतर शिक्षणमंत्र्यांना मान असतो. बहुजन समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी केले. शिक्षणमंत्री बदलला की अभ्यासक्रम बदलतो. काही तरी नवीन करण्याच्या महत्त्वाकांक्षेने दरवेळी शिक्षकांकरवी विद्यार्थ्यांवर नवीन प्रयोगाचे ओझे लादले जाते. हे कुठेतरी थांबले पाहिजे, आपला यास विरोध आहे. अन्य राज्यांच्या तुलनेने महाराष्ट्राचा शिक्षण विकास निर्देशांक अद्यापही कमी आहे. देशात महाराष्ट्र याबाबतीत १२ व्या क्रमांकावर आहे.
ही परिस्थिती बदलण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न केले पाहिजे. अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांनी आॅनलाइन नोंदणीत जिल्हा राज्यात प्रथम असल्याचे व वटार-पिंपळद या दोन शाळांना आयएसओचे मानांकन लाभल्याचे सांगितले. सभापती उषा बच्छाव यांनी सांगितले की, पुढील वर्षी जानेवारीपासून महिला शिक्षिकांसाठीही सावित्रीबाई फुले आदर्श महिला शिक्षक पुरस्कार दिला जाणार असल्याचे सांगितले. मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी जिल्ह्णात ‘अ’ श्रेणीत असलेल्या तीन शाळांची संख्या १३५ पर्यंत पोहोचली असून, जिल्ह्णात शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राथमिक शिक्षणाधिकारी रहीम मोगल यांनी केले, तर सूत्रसंचालन बी. जी. गरड व अश्विनी जोशी यांनी केले. (प्रतिनिधी)