ताणेपर्यंत तुटे; पण उमेदवार कुठे?
By Admin | Updated: September 16, 2014 00:07 IST2014-09-15T21:52:38+5:302014-09-16T00:07:02+5:30
ताणेपर्यंत तुटे; पण उमेदवार कुठे?

ताणेपर्यंत तुटे; पण उमेदवार कुठे?
नाशिक : गेल्या निवडणुकीत जिल्ह्यातील पंधरापैकी नऊ जागा लढविणाऱ्या सेनेला तीन व सहापैकी एक जागा मिळविणाऱ्या भाजपात होऊ घातलेल्या विधानसभेच्या जागावाटपावरून बेबनाव निर्माण होऊन त्यातून युती तुटण्याची शक्यता निर्माण झाल्याने त्याचा आगामी निवडणुकीवर परिणाम होण्याची चिन्हे आहेत. निवडणूकपूर्व चाचणीत दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी स्वबळावर निवडणूक लढविण्याचा धरलेला आग्रह व आता नेमकी तशीच परिस्थिती समोर उभी ठाकल्याने वरकरणी युती संपुष्टात आणण्याचे दोन्ही पक्षांच्या निवडणूक इच्छुकांकडून स्वागत करण्यात येत असले तरी, महिन्यावर येऊन ठेपलेल्या निवडणुकीची तयारी वर्षभरापासून करीत असलेल्या दोन्ही पक्षांत ऐनवेळी सर्वच मतदारसंघांत उमेदवार कोठून आणायचे, असा प्रश्न आ वासून उभा आहे.
सेना-भाजपाच्या युती तुटण्यावर ‘शिंक्याचे तुटणे व बोक्याचे फावणे’ अशा पद्धतीने दोन्ही कॉँग्रेस व महाराष्ट्र नवनिर्माण सेना लक्ष ठेवून आहेत; परंतु युती दुभंगल्यास त्याचे बरे-वाईट परिणाम उपरोक्त पक्षांवरही होणार आहेत. ज्यांना कॉँग्रेस आघाडीकडून उमेदवारी मिळणार नाही, त्यांच्यासाठी सेना-भाजपाची दारे जशी उघडली जातील तसेच मनसेलाही युतीच्या मतविभाजनाचा फायदा मिळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे सेना-भाजपाचे स्वबळावर लढण्याचा जिल्ह्यातील नाही म्हटले तरी सात ते आठ मतदारसंघांच्या राजकारणावर निश्चित परिणाम होईल, हे मात्र खरे.