सृष्टिचैतन्यासाठी वरुणराजाला साकडे
By Admin | Updated: June 10, 2016 23:36 IST2016-06-10T23:34:58+5:302016-06-10T23:36:13+5:30
सृष्टिचैतन्यासाठी वरुणराजाला साकडे

सृष्टिचैतन्यासाठी वरुणराजाला साकडे
गंगापूजन : स्वामी समर्थ सेवामार्गाचा रामकुंडावर सोहळापंचवटी : अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्ग व गंगा गोदावरी पुरोहित संघ यांच्या वतीने रामकुंड येथे शुक्रवारी सायंकाळी गुरुमाउली अण्णासाहेब मोरे यांच्या हस्ते व शेकडो सेवेकऱ्यांच्या उपस्थितीत गंगापूजनाचा मंगलमय सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी गंगा गोदावरीचे पूजन करण्यात येऊन भरपूर पर्जन्यवृष्टी व्हावी, देशात हरितक्रांती घडावी यासाठी साकडे घालण्यात आले.
ज्येष्ठ १ ते ज्येष्ठ शु.१० या दहा दिवसांच्या कालावधीत संपूर्ण भारतभर गंगा दशहरा उत्सव साजरा केला जातो. नद्या आपल्याला उपकृत करणाऱ्या माता आहे, त्या केवळ मानवालाच नव्हे तर संपूर्ण जीवसृष्टीला नवचैतन्य देतात म्हणून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सर्वत्र गंगा दशहरा उत्सव साजरा करून गंगा गोदावरीला पर्जन्यवृष्टीसाठी साकडे घालतात.
या गंगापूजन कार्यक्रमनिमित्ताने दुपारी गंगापूररोडवरील श्री स्वामी समर्थ केंद्रातून गंगाजल कलशाची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी शेकडो महिला मंगल कलश घेऊन मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या. गंगामातेचे नामस्मरण करीत अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने मिरवणूक रामकुंड येथे आल्यानंतर मोरे यांनी सपत्नीक विधिवत गंगापूजन करून आरती करण्यात आले. त्यानंतर त्यांनी उपस्थित भाविकांना मार्गदर्शन केले. देशात कधी नव्हे इतका भीषण दुष्काळ पडला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना आत्महत्त्या कराव्या लागत आहे. अशा स्थितीत पर्जन्यराजाला विनंती करण्याची दीडशे वर्षांची परंपरा पाळली जात आहे. त्यातून यंदा निश्चितच चांगला पाऊस पडेल आणि शेतकरी तसेच देशभरातील नागरिक सुखी समृद्ध होतील, असा विश्वास गुरुमाउली अण्णासाहेब मोरे यांनी व्यक्त केला.
यावेळी सतीश शुक्ल यांनी पौरोहित्य केले. कार्यक्र माला खासदार हेमंत गोडसे, आमदार सीमा हिरे, महापौर अशोक मुर्तडक, शिक्षण मंडळांचे सभापती संजय चव्हाण यांच्यासह शेकडो सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)