सत्ताशकट भाजपाच्या हाती !
By Admin | Updated: February 24, 2017 01:55 IST2017-02-24T01:55:07+5:302017-02-24T01:55:25+5:30
कमळ फुलले : सेनेचे स्वप्न भंगले, आजी-माजी नगरसेवकांना धक्का

सत्ताशकट भाजपाच्या हाती !
नाशिक : नाशिक महापालिकेचे सत्ताशकट आता पुढील पाच वर्षांसाठी एकट्या भाजपाच्या हाती असणार आहे. मागील निवडणुकीप्रमाणेच यंदाही स्वबळ आजमावत भाजपाने तब्बल ६६ जागा खिशात टाकल्या. नगरपालिका निवडणुकीत जिल्ह्यात सेनेने अभूतपूर्व यश संपादन केल्यानंतर महापालिका निवडणुकीतही सेनेची विजयाची वाटचाल कायम राहील, असे संकेत दिले जात होते. परंतु, भाजपाच्या त्सुनामीपुढे सेना वाहून गेली आणि ३५ जागांवरच समाधान मानावे लागले. केवळ पाच जागा मिळविणाऱ्या मनसेची दारुण स्थिती झाली. भाजपाने स्पष्ट बहुमत मिळविल्याने यंदा प्रथमच सत्तास्थापनेत घोडेबाजाराला लगाम बसणार आहे.
महापालिका निवडणुकीसाठी यंदा प्रथमच बहुसदस्यीय प्रभाग पद्धती राबविण्यात आली. ३१ प्रभागांतील १२२ जागांसाठी ८२१ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. निवडणुकीत यंदा ६१.६० टक्के विक्रमी मतदान झाले. निवडणूक पूर्व सोशल मीडियावर फिरलेल्या सर्वेक्षणात शिवसेनेच्या बाजूने कौल देण्यात आला होता. याशिवाय, कुणालाही स्पष्ट बहुमत मिळणार नाही, असे आडाखेही बांधले जात होते. परंतु, भाजपाने स्वबळावर लढताना एकहाती सत्ता संपादन केली. भाजपाने ११९ जागा लढवत ६६ जागा मिळविल्या, तर शिवसेनेला १२२ जागांवर लढताना ३५ जागांवर समाधान मानावे लागले. मागील निवडणुकीत ४० जागा मिळवून पाच वर्षे नवनिर्माणाची प्रतीक्षा करायला लावणाऱ्या मनसेला अपेक्षेप्रमाणे नाशिककरांनी ठेंगा दाखविला. मनसेला केवळ पाच जागांवर समाधान मानावे लागले. निवडणुकीत कॉँग्रेस-राष्ट्रवादीचीही वाताहत झाली. कॉँग्रेस व राष्ट्रवादीने प्रत्येकी सहा जागा मिळविल्या. नाशिककरांनी अपक्षांनाही फारसे स्थान दिले नाही. उपमहापौर गुरुमित बग्गा यांच्यासह केवळ तीनच अपक्ष निवडून आले. रिपाइंलाही मतदारांनी नाकारत केवळ एकच जागा आठवले गटाच्या पदरात टाकली. माकपाचे मागील निवडणुकीत तीन नगरसेवक निवडून आले होते. परंतु, यंदा माकपाला मतदारांनी शून्यावर बाद केले. निवडणुकीत ७९ नगरसेवक पुन्हा नशीब आजमावत होते. त्यातील ३८ नगरसेवकांनाच विजयाला गवसणी घालता आली तर तब्बल ४१ नगरसेवकांना पराभवाचे धनी व्हावे लागले. पराभूतांमध्ये प्रामुख्याने, माजी महापौर यतिन वाघ, विरोधी पक्षनेत्या कविता कर्डक, रिपाइंचे प्रकाश लोंढे, सेनेचे सचिन मराठे, भाजपाचे कुणाल वाघ, अपक्ष पवन पवार, माजी महापौर नयना घोलप, कॉँग्रेसच्या अश्विनी बोरस्ते, मनसेचे गटनेते अनिल मटाले, माकपाचे तानाजी जायभावे, कॉँग्रेसचे लक्ष्मण जायभावे, सेनेच्या वंदना बिरारी, भाजपाचे सुदाम कोंबडे, शिक्षण सभापती संजय चव्हाण यांचा समावेश आहे. निवडणुकीत काही लढतींकडे विशेष लक्ष लागून होते. त्यात भाजपाचे आमदार बाळासाहेब सानप यांचे पुत्र मच्छिंद्र सानप, माजी आमदार वसंत गिते यांचे पुत्र प्रथमेश गिते हे विजयी झाले. तर माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या दोन्ही कन्या नयना व तनुजा, माजी महापौर दशरथ पाटील यांचे पुत्र प्रेम पाटील, भाजपा नगरसेवक दिनकर पाटील यांचे पुत्र अमोल पाटील यांना पराभव पत्करावा लागला. निवडणुकीत १७ माजी नगरसेवकांनाही पुन्हा एकदा महापालिकेत येण्याची संधी मिळाली. त्यात भाजपाचे अरुण पवार, सुरेश खेताडे, कमलेश बोडके, भिकुबाई बागुल, अनिल ताजनपुरे, दिनकर आढाव, सीमा ताजणे, चंद्रकांत खोडे, अलका अहिरे व प्रतिभा पवार, कॉँग्रेसच्या हेमलता पाटील, राष्ट्रवादीचे गजानन शेलार, सेनेचे संतोष साळवे, सत्यभामा गाडेकर, अपक्ष मुशीर सय्यद यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)
महापौरपदाचे दावेदार
भाजपाने पूर्ण बहुमत प्राप्त केल्याने आता महापौरपदासाठी दावेदारी सुरू झाली आहे. पहिल्या अडीच वर्षांसाठी महापौरपद अनुसूचित जमातीसाठी आरक्षित झाले आहे. या गटातून भाजपाकडून ज्येष्ठ नगरसेवक रंजना भानसी, माजी नगरसेवक सुरेश खेताडे, प्रा. सरिता सोनवणे, माजी नगरसेवक पुंडलिक खोडे, रुपाली निकुळे हे पाच उमेदवार निवडून आले आहेत. ज्येष्ठताक्रमानुसार सलग पाचव्यांदा महापालिकेत निवडून आलेल्या रंजना भानसी या प्रबळ दावेदार आहेत. आता पक्षश्रेष्ठी कोणाच्या पारड्यात महापौरपदाचे वजन टाकतात, हे पाहणे लक्षवेधी ठरणार आहे.बहुसदस्यीय रचनेचा भाजपाला लाभ
बहुसदस्यीय प्रभाग रचनेचा सर्वाधिक लाभ हा भाजपालाच झालेला आहे. भाजपाचे आठ प्रभागांमधून प्रत्येकी चारही उमेदवार निवडून आले आहेत. त्यात प्रभाग क्रमांक १, २, ४, ९, १०, २०, २३ आणि ३० चा समावेश आहे. तर शिवसेनेचे प्रभाग ८ मधून चार सदस्य निवडून आले आहेत. कॉँग्रेस, राष्ट्रवादी, मनसेला पॅनल पद्धतीचा लाभ झाला नाही. पॅनल पद्धतीमुळे भाजपाच्या खात्यात तब्बल ३२ जागा जमा होऊ शकल्या आहेत.