‘पाणीमीटर’प्रकरणी मनसेकडून भाजपाची झडती
By Admin | Updated: April 23, 2016 00:34 IST2016-04-22T23:51:33+5:302016-04-23T00:34:16+5:30
पालकमंत्री लक्ष्य :जळगाव जिल्ह्यातील धरणात मीटर नसल्याचा दावा

‘पाणीमीटर’प्रकरणी मनसेकडून भाजपाची झडती
नाशिक : पाणीप्रश्नी सत्ताधारी मनसे विरुद्ध भाजपा यांच्यात चांगलीच जुंपली असून, गंगापूर धरणातील बंद पडलेल्या पाणी लिफ्टिंग मीटरचा मुद्दा उपस्थित करत नाशिक महापालिकेला लक्ष्य करणाऱ्या भाजपावर आता मनसेने पलटवार केला असून, पालकमंत्र्यांचा जिल्हा असलेल्या जळगाव महापालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघूर धरणात पाणीमीटरच बसविले नसल्याचा दावा गटनेता अनिल मटाले यांनी केला आहे. दरम्यान, महापालिकेने धरणावर नवीन पाणीमीटर गुरुवारी बसविले असून, पंपाद्वारे पाणी उपशाची अचूक नोंद होत असल्याने मीटरचा मुद्दा गैरलागू ठरतो, अशी भूमिका प्रशासनाने घेतली आहे.
पाणीप्रश्नी एकमेकांना घेरण्याची स्पर्धा गेल्या काही महिन्यांपासून महापालिकेतील सत्ताधारी महाआघाडी आणि भाजपा यांच्यात सुरू आहे. मराठवाड्याला पाणी सोडल्याने नाशिककरांमध्ये भाजपाविरुद्ध कमालीचा रोष असल्याने भाजपाकडून आता सारवासारव करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. त्याचा पहिला अंक आमदार देवयानी फरांदे यांनी मेंढगिरी समितीबाबत केलेल्या विधानांमुळे पाहायला मिळाला. मात्र, सत्ताधारी महाआघाडीसह शिवसेनेलाही कोंडीत पकडण्याची व्यूहरचना भाजपाकडून सुरू आहे. त्यातच भाजपाला गंगापूर धरणातील पंपिंग स्टेशनवरील बंद पडलेल्या पाणी लिफ्टिंग मीटरचा फुटकळ विषय मिळाला आणि आमदारांसह पदाधिकाऱ्यांनी गंगापूर धरणावर प्रत्यक्ष पाहणी करून महापालिकेसह सत्ताधाऱ्यांना जाब विचारला. पालकमंत्री गिरीश महाजन यांनीही बंद मीटरप्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले. भाजपाकडून पाणीमीटरचा मुद्दा तापविला जात असतानाच मनसेने याबाबत राज्यातील अन्य महापालिकांच्या स्थितीचा आढावा घेण्यास सुरुवात केली असता पालकमंत्री महाजन यांच्या जिल्ह्यातीलच जळगाव महापालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघूर धरणात पाणी लिफ्टिंग मीटर बसविले नसल्याचे लक्षात आले. याबाबत मनसेचे गटनेते अनिल मटाले यांनी सांगितले, जळगाव महापालिकेकडून वाघूर धरणातून रोज ७५ ते ८० दसलक्ष लिटर्स पाणी उचलले जाते. मात्र, वाघूर धरणात जळगाव महापालिकेने कुठलेही पाणी लिफ्टिंग मीटर बसविलेले नाही. केवळ जलशुद्धीकरण केंद्रांवर पाणीमीटर बसविले आहे.
नाशिक महापालिकेने स्वत:हून आपल्या सोयीसाठी धरणावर पाणीमीटर बसविलेले आहेत. ते नादुरुस्त झाल्यानंतर त्याच्या दुरुस्ती अथवा नवीन बदलासंबंधी प्रक्रियेतून जावे लागते. हे भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना ज्ञात असेलच, परंतु बंद पडलेल्या पाणीमीटरचा मुद्दा उपस्थित करत मूळ प्रश्नाला बगल देण्याचा हा भाजपाचा प्रयत्न असल्याचा आरोपही मटाले यांनी केला आहे. जलसंपदा खात्याकडून ज्या दिवशी महापालिकेला पत्र मिळते त्याच दिवशी भाजपाचे आमदार व पदाधिकारी गंगापूर धरणावर जाऊन पाहणी करतात, याचा अर्थ हा नियोजनबद्ध डाव असल्याचेही मटाले यांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी)