सोयीच्या भूमिकेनेच भाजपाला दणका
By Admin | Updated: July 5, 2014 00:16 IST2014-07-05T00:02:53+5:302014-07-05T00:16:02+5:30
सोयीच्या भूमिकेनेच भाजपाला दणका

सोयीच्या भूमिकेनेच भाजपाला दणका
नाशिक : मोलाचे स्थायी समिती सभापतिपद मिळाले नाही म्हणून आदळआपट करणाऱ्या भाजपाच्या शहराध्यक्षांनी थेट मनसेशी युती तोडण्याची भाषा सुरू केली आहे. तथापि, आतून एक आणि बाहेरून दुसरी भूमिका घेणाऱ्या भाजपाला हा दणका मिळणे स्वाभाविकच होते. त्यामुळे आता मनसेला इशारे देण्याच्या माध्यमातून भाजपा आपली नाचक्की मात्र करून घेत आहे.
राजकारणात कोणी कोणाचा फार काळ मित्र नसतो आणि शत्रूही नसतो. तथापि, शिस्त आणि वैचारिकता या विषयावर आपल्याच पक्षाचे स्वामित्व हक्क आहेत असे मानणाऱ्या भाजपाने अशा अनेक तडजोडी महापालिकेत केल्या आहेत. त्यामुळे सेनेबरोबर सत्तेची लागलेली गोडी कायम ठेवण्यासाठी दोन वर्षांपूर्वी मनसेशी घरोबा केला. महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजपाची महायुती दोन तपांपासून आहे; परंतु पालिकेच्या निवडणुकीत सेनेचे अवघे २२ नगरसेवक निवडून आले आणि त्यांना सत्ता मिळत नाही हे दिसू लागल्यानंतर भाजपाने लगेचच कोलांटउडी घेतली आणि सत्तेजवळ जाऊ पाहणाऱ्या मनसेशी घरोबा केला. मनसेचे सर्वाधिक म्हणजेच चाळीस नगरसेवक निवडून आले असल्याने जनाधार त्यांच्या बाजूने आहे, त्यामुळेच जनाधाराला साथ दिली अशी गोंडस भूमिका भाजपाचे शहराध्यक्ष असलेल्या लक्ष्मण सावजी यांनी मांडली होती. त्यावेळी शिवसेनेने बरीच टीका केली; परंतु तेव्हा मनसे या नव्या पक्षाला भवितव्य असल्याचा साक्षात्कार भाजपाला झाला होता.
महापालिकेत मनसेबरोबर आणि बाहेर मनसेचा स्पर्धक असलेल्या शिवसेनेबरोबर युती कायम ठेवून आपण राजकारणातील चाणक्य कसे आहोत असेच भाजपाचे हे मुखंड दाखवित होते. एका म्यानात दोन तलवारी ठेवण्याचा प्रयत्न अखेर भाजपाच्या कधी ना कधी अंगलट येणार होताच आणि झालेही तसेच. स्थायी समितीच्या निवडणुकीत मनसेने सभापतिपद देण्यास नकार तर दिलाच; परंतु साम, दाम, दंड, भेद, नीतीचा वापर करून सभापतिपद पटकावले. भाजपाने ऐनवेळी सेनेची मदत घेऊन आव्हान देण्याचा प्रयत्न केला; परंतु तो अयशस्वी ठरला. त्यामुळे भाजपाने संतापात अधिकच थयथयाट करून यापुढे आम्हाला कोणत्याच निवडणुकीत गृहीत धरू नका असा इशाराही द्यायला सुरुवात केली आहे.
इतकेच नव्हे तर मनसेने आता जनाधार गमावल्याचा साक्षात्कारही भाजपाला झाला आहे. आधी सेनेशी दगा आणि मनसेशी दोस्ती, मग मनसेला दगा आणि सेनेशी हातमिळवणी, अशी सोयीची भूमिका घेणाऱ्या शहराध्यक्षांमुळेच भाजपाला नामुष्की पत्करावी लागली आहे, हे त्यांना मान्य करण्यावाचून पर्याय तरी काय? (प्रतिनिधी)