भाजपा विरोधक एकवटले
By Admin | Updated: April 9, 2017 00:04 IST2017-04-09T00:04:37+5:302017-04-09T00:04:49+5:30
महापालिकेत भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतरही विरोधकांना स्थायी समितीसह अन्य विषय समित्यांवर प्रतिनिधित्व मिळण्याची आस कायम आहे

भाजपा विरोधक एकवटले
नाशिक : राजकारणात कुणी कुणाचा शत्रू अथवा मित्र नसतो. सत्तापदांचा लाभ मिळविण्यासाठी पक्षीय विचारसरणी अथवा ध्येयधोरणांना तिलांजली दिली जाते आणि एकमेकांच्या गळ्यात गळे घातले जातात. महापालिकेत भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतरही विरोधकांना स्थायी समितीसह अन्य विषय समित्यांवर प्रतिनिधित्व मिळण्याची आस कायम असून, त्याचेच निमित्त होत सर्व भाजपा विरोधक एकवटले आहेत.
स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत भाजपा विरोधात असलेल्या सेनेच्या उमेदवाराला कॉँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेच्या सदस्यांनी मतदान करत संघर्षाचे बिगुल फुंकले आहे.
महापालिका निवडणुकीत भाजपाने ६६ जागा जिंकत स्पष्ट बहुमत प्राप्त केले तर त्याखालोखाल शिवसेना-३५, कॉँग्रेस-६, राष्ट्रवादी-६, मनसे-५, अपक्ष-३ आणि रिपाइं-१ असे बलाबल आहे. महापालिकेत भाजपाकडे स्पष्ट बहुमत असल्याने सर्व सत्तापदे साहजिकच भाजपाच्याच ताब्यात जाणार, हे निश्चित आहे. मात्र, भाजपाला कोंडीत पकडण्यासाठी शिवसेनेसह सर्व विरोधक एकत्र आले आहेत.
महापौर-उपमहापौरपदाची निवडणूक बिनविरोध झाल्याने विरोधकांची भूमिका स्पष्ट झालेली नव्हती. परंतु, स्थायी समितीसह अन्य विषय समित्यांवर तौलनिक संख्याबळात आपण भाजपाच्या ऊरात धडकी भरवू शकतो, हे लक्षात आल्याने सेनेसह सर्व विरोधकांनी एकत्र येत विभागीय आयुक्तांकडे गटनोंदणीचा डाव रचला. या डावात कॉँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेने अपक्षांना सोबत घेत बाजी मारली परंतु शिवसेना-रिपाइंच्या गटनोंदणीला विभागीय आयुक्तांच्या निर्णयाने खोडा घातला. त्यामुळे तौलनिक संख्याबळात भाजपाच सरस राहिली. शिवसेनेने विभागीय आयुक्तांच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले असले तरी त्या निर्णयाची प्रतीक्षा करेपर्यंत भाजपा मात्र सत्तापदांचा पुरेपूर लाभ उठवणार आहे. विभागीय आयुक्तांनी सेना-रिपाइं एकत्रित गटनोंदणी केली असती तर स्थायीवर ८-८ असे समसमान बलाबल होऊन सभापतिपदासाठी चिठ्ठी पद्धतीचा अवलंब करावा लागला असता. परंतु, सद्यस्थितीत भाजपाचे ९ आणि विरोधकांचे ७ असे बलाबल असल्याने स्थायीवर भाजपाचाच वरचष्मा असणार आहे. स्थायी समिती सभापती निवडणुकीच्या निमित्ताने सेना उमेदवाराला उघडपणे मतदान करत कॉँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेने आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे यापुढे सभागृहात ६६ विरुद्ध ५६ असा सामना बघायला मिळणार आहे.
मागील पंचवार्षिक काळातील उत्तरार्धातही भाजपा विरोधात अन्य सर्व पक्ष एकवटले होते. आताही त्याचीच पुनरावृत्ती बघायला मिळणार असून, ही भाजपाविरोधी आगामी संघर्षाची नांदी मानली जात आहे. (प्रतिनिधी)