पेठ तालुक्यातील स्थलांतर रोखण्याचे मोठे आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:10 IST2021-07-09T04:10:33+5:302021-07-09T04:10:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पेठ : स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही अनेक मूलभूत सुविधांपासून कोसो दूर असलेल्या पेठ तालुक्यातून वर्षानुवर्षे होणारे स्थलांतर ...

पेठ तालुक्यातील स्थलांतर रोखण्याचे मोठे आव्हान
लोकमत न्यूज नेटवर्क
पेठ : स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही अनेक मूलभूत सुविधांपासून कोसो दूर असलेल्या पेठ तालुक्यातून वर्षानुवर्षे होणारे स्थलांतर रोखायचे असेल तर स्थानिक मजुरांच्या हाताला काम, सुशिक्षितांना रोजगार व शेतीला पाणी उपलब्ध करून देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
साधारण १ लक्ष ३२ हजारांच्या आसपास लोकसंख्या असलेल्या पेठ तालुक्यात १४५ महसुली गावे असून त्या अंतर्गत येणाऱ्या वाडी वस्तीवर नागरी वास्तव्यास असतात. भौगोलिकदृष्ट्या वरवर निसर्ग सौंदर्याने तालुका नटला असला तरी सिंचन व औद्योगिक विकासाच्या बाबतीत प्रचंड मागासलेला आहे. साधारण दोन हजार मिलिमीटरच्या वर पावसाची सरासरी असताना उन्हाळ्यात मात्र हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकणारी जनता आजही दृष्टीस पडते. अशात शेतीसाठी पाणी उपलब्ध करणे म्हणजे आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार, अशी गत झाली आहे. पेठ तालुक्यात पाहुचीबारी ते नाचलोंढीपर्यंत आठ लहान मोठी धरणे असली तरी त्यांची साठवण क्षमता कमी असल्याने सद्य:स्थितीतील धरणे तालुकावासीयांची तहान भागवण्यासाठी असमर्थ ठरत आहेत. सध्या देशभर गाजत असलेले नार- पार, दमणगंगा, एकदरे हे चर्चेत असलेले भविष्यातील मोठे प्रकल्प याच तालुक्यात आहेत. मात्र, नद्या जोड अथवा पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी अडवून ते पूर्ववाहिनी नद्याकडे वळवणे हे राष्ट्रीय पातळीवरील प्रकल्प स्थानिक जनतेला मृगजळच आहेत. कारण केवळ पाणी अडवून लिफ्टद्वारे घाटाच्या वर घेऊन जाण्यात स्थानिकांच्या जमिनीचा, पाण्याखाली जाणाऱ्या जमिनींचा किंवा अडवलेल्या पाण्यावरील हक्काचा कोणताही सूक्ष्म आराखडा तयार करण्यात न आल्याने या प्रकल्पातून स्थानिकांची हेळसांड होणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
इन्फो
प्रलंबित सिंचन प्रकल्प
पेठ तालुक्यातील जवळपास सर्व नद्या पश्चिम वाहिनी असल्याने पावसाचे पाणी गुजरात राज्यात वाहून जाते. यासाठी अनेक वर्षांपासून तालुक्यातील केळविहीर, बाडगी, झरी, भुवन, डोंगरशेत आदी भागांत मध्यम लघु सिंचन प्रकल्पांचे सर्वेक्षण व आराखडे तयार करून शासनाच्या मंजुरीसाठी सादर करण्यात आले असल्याचे सांगण्यात येत असले तरीही या प्रकल्पांचा शासन दरबारी पाठपुरावा करून प्रत्यक्ष काम सुरू करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेणे आवश्यक झाले आहे. सिंचन प्रकल्पाद्वारे आहे त्या जागेत पाणी अडवले तर जनतेचा पिण्याच्या पाण्यासोबत शेतीचा प्रश्न सुटेल. केवळ पाणी नाही म्हणून ८ ते १० महिने द्राक्ष बागांवर स्थलांतर करणारे शेतमजूर गावी स्थिरावतील.
इन्फो
औद्योगिक वसाहतीला मिळावी चालना
पेठ तालुक्यात शिक्षणाचे प्रमाण वाढले. मात्र, त्या प्रमाणात रोजगाराच्या संधी मात्र उपलब्ध होऊ शकल्या नाहीत. गावागावात पदवी, पदव्युत्तर शिक्षणासह व्यावसायिक व तंत्रज्ञानाचे शिक्षण घेतलेले अनेक बेरोजगार तरुण असून पेठ येथील औद्योगिक वसाहतीला नवसंजीवनी दिल्यास स्थानिक युवकांना नोकऱ्या मिळतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आजही अनेक सुशिक्षित तरुण बेरोजगारीमुळे द्राक्षांच्या बागेत मजुरी करताना दिसून येत आहेत. पेठ तालुक्यात भात, नागलीसह आंबा, चिकू, फणस यासारखी फळझाडे लावण्यात आली आहेत. कृषी विभागाकडून कच्च्या मालावर प्रक्रिया उद्योगाला चालना देण्याची आवश्यकता आहे. कोरोनासारख्या महामारीत हाताला काम व शेतीला पाणी मिळावे ही माफक अपेक्षा तालुकावासीयांकडून व्यक्त केली जात आहे.
फोटो- ०८पेठ वार्तापत्र
080721\08nsk_27_08072021_13.jpg
फोटो- ०८पेठ वार्तापत्र