भगूरला सावरकर साहित्य संमेलन
By Admin | Updated: January 10, 2016 23:21 IST2016-01-10T23:18:13+5:302016-01-10T23:21:04+5:30
जन्मगावी सोहळा : दोन दिवस विविध कार्यक्रम

भगूरला सावरकर साहित्य संमेलन
नाशिक : कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट (ठाणे) व स्वातंत्र्यवीर सावरकरप्रेमी मित्रमंडळ (औरंगाबाद) यांच्या संयुक्त विद्यमाने सावरकरांच्या जन्मगावी भगूर येथे येत्या २५ व २६ फेब्रुवारी रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. सावरकरांच्या ५०व्या आत्मार्पण दिनानिमित्त आयोजित या संमेलनात अनेक कार्यक्रम होणार आहेत.
संमेलनाचे नियोजित अध्यक्ष तथा देशभक्त कोशाचे संपादक चंद्रकांत शहासने व एकनाथ शेटे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सावरकरांच्या ५०व्या आत्मार्पण दिनानिमित्त भगूर येथे हे संमेलन घेतले जाणार असून, त्यात सावरकरांच्या विचारांचा प्रसार करण्याच्या दृष्टीने चर्चा केली जाणार आहे.
संमेलनाचे स्वरूप उत्सवी न ठेवता, महाराष्ट्र, गोवा, गुजरात, कर्नाटक या राज्यांतील कार्यकर्त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाणार आहे. संमेलनात दि. २५ फेब्रुवारी रोजी सायंंकाळी ६ वाजता कार्यकर्त्यांचा मेळावा, दि. २६ रोजी सकाळी साहित्यदिंडी, सावरकर स्मारकाजवळ १०८ याज्ञिकांकडून वेदघोषात क्रांतिकारकांचे पुण्यस्मरण, विज्ञान, संरक्षण, काव्य, महिला सबलीकरण, विद्यार्थीविश्व आदि अनेक विषयांवर परिसंवाद घेतले जाणार आहेत. सावरकरांच्या आत्मार्पणानंतर प्रकाशित झालेल्या मृत्यूलेखांवर आधारित स्मरणिकेचे प्रकाशन, पतितपावन संघटनेचे प्रांताध्यक्ष एस. झेड. देशमुख यांचे ‘अभिनव
भारत व जॅक्सन वधाची कहाणी’
या विषयावर व्याख्यान, शेकडो क्रांतिकारकांच्या छायाचित्रांचे प्रकाशन आदि उपक्रम होणार
आहेत.
संमेलनाला येणाऱ्या कार्यकर्त्यांची निवास व भोजनव्यवस्था विनामूल्य करण्यात आली असून, संमेलनासाठी कोणतेही शुल्क नाही. कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे,
असे आवाहन निमंत्रक भाऊसाहेब सुराडकर, अनिरुद्ध जोशी, अॅड. भानुदास शौचे यांनी केले
आहे. (प्रतिनिधी)