जोरण : वातावरणातील सततच्या बदलांमुळे रब्बी पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव होऊन उत्पादनात मोठी घट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दोन ते तीन दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे परिसरातील शेतकरी धास्तावला आहे. गेल्या चार ते पाच वर्षांपासून पर्जन्यवृष्टी कमी होत असल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. यंदाच्या पावसाळ्यात शेवटच्या चरणात समाधानकारक पाऊस झाल्याने बळीराजाच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. तब्बल पाच वर्षांनंतर झालेल्या पावसाच्या भरवशावर परिसरात खरिपाच्या पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड झाली; मात्र सर्वत्र पिके जोमात असताना सतत बदलणाऱ्या वातावरणामुळे खरिपातील सर्वच पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव होऊन उत्पादनात मोठी घट आली, तर अनेक पिके शेतातच सडल्याने उत्पादनावर केलेल्या खर्चातही तूट आल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला. असे असतानाही रब्बीच्या पिकांसाठी बळीराजाने पुन्हा कंबर कसली व उन्हाळी कांदा, टमाटे, फ्लॉवर आदि पिकांची लागवड केली आहे. या रोगांपासून पिके वाचवण्यासाठी महागड्या कीटकनाशकांची फवारणी सध्या चालू आहे. २-३ दिवसांपासून निर्माण होणारे ढगाळ वातावरण बळीराजाची काळजी वाढवणारे ठरत आहे. त्यातच गेल्या दोन दिवसांपूर्वी हवामान खात्याने गारपीट होण्याचा इशारा दिला होता. सतत बदलणाऱ्या वातावरणामुळे तसेच अवकाळी पाऊस, गारपीट होण्याच्या शक्यतेमुळे कांदा व इतर उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होण्याची भीती शेतकऱ्यांना सतावते आहे. चिंतेचे हे ढग निवळले तरच रब्बीची पिके या संकटातून वाचतील व हाती चार पैसे येतील अशी बळीराजाला आशा आहे. (वार्ताहर)
ढगाळ वातावरणामुळे बळीराजा धास्तावला
By admin | Updated: January 22, 2016 22:38 IST