बाप्पांचे विसर्जन अनंत चतुर्दशीला की पौर्णिमेला?
By Admin | Updated: September 3, 2014 00:45 IST2014-09-03T00:43:14+5:302014-09-03T00:45:19+5:30
बाप्पांचे विसर्जन अनंत चतुर्दशीला की पौर्णिमेला?

बाप्पांचे विसर्जन अनंत चतुर्दशीला की पौर्णिमेला?
नाशिक : वाजत-गाजत बाप्पा घरोघरी मखरामध्ये विराजमान झाले खरे; परंतु दहा दिवसांनंतर बाप्पाच्या विसर्जनाबाबत गणेशभक्त संभ्रमात पडले आहेत. सोमवार, दि. ८ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीला विसर्जन होईल. परंतु त्याचदिवशी सकाळी १० वाजून ४८ मिनिटांनी प्रोष्ठपदी पौर्णिमा लागत असल्याने नेमके विसर्जन सकाळी की दुपारनंतर करायचे, याबाबत गणेशभक्तांच्या मनात गोंधळ वाढला आहे. पंचांगकर्त्यांनी मात्र ८ सप्टेंबरला दिवसभरात कधीही विसर्जन करण्यासंबंधी खुलासा केला आहे.
गणेशोत्सवात आता हळूहळू रंगत वाढत चालली आहे. पावसाळी वातावरण असतानाही भाविकांचा उत्साह ओसंडून वाहतो आहे. पाच दिवसांनंतर बाप्पाला वाजत-गाजत निरोप दिला जाईल; परंतु यंदा विसर्जनतिथीबाबत सर्वसामान्य भाविकांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. सोमवार, दि. ८ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आहे. मात्र, सकाळी १० वाजून ४८ मिनिटांनी प्रोष्ठपदी अर्थात भाद्रपद पौर्णिमेला प्रारंभ होत आहे. दुसऱ्या दिवशी मंगळवारी (दि.९) सकाळी ७ वाजून ७ मिनिटांनी पौर्णिमेची समाप्ती होईल. त्यामुळे अनंत चतुर्दशी सकाळी १० वाजून ४८ मिनिटांपर्यंतच असल्याने त्या कालावधीच्या आत विसर्जन करावे लागेल. कारण नंतर पौर्णिमेस प्रारंभ होत असल्याने विसर्जन करता येत नाही. दुसऱ्या दिवशी महालयारंभ अर्थास पितृपक्षास प्रारंभ होत असल्याने श्राद्धकाळात गणेशविसर्जन होऊ शकत नाही. परिणामी, नेमके विसर्जन कधी आणि केव्हा करावे, यासारखे प्रश्न सर्वसामान्य भाविकांच्या मनात गोंधळ माजवत आहेत. सर्वसाधारणपणे बाप्पाची विधिवत पूजा करून आणि नैवेद्य दाखवून दुपारनंतर रात्री उशिरापर्यंत विसर्जन केले जाते. परंतु यंदा चतुर्दशी सकाळी पावणे अकराच्या दरम्यानच संपत असल्याने चतुर्दशी संपण्याच्या आत विसर्जन करावे लागेल, असा एक मतप्रवाह गणेशभक्तांमध्ये आहे. दाते पंचांगकर्त्यांनी ८ सप्टेंबर रोजी नेहमीप्रमाणे केव्हाही गणेशविसर्जन करावे, असा खुलासा केला आहे. (प्रतिनिधी)