बळीराजा हवालदिल : द्राक्षासह कांदा पिक धोक्यात
By Admin | Updated: February 28, 2015 23:56 IST2015-02-28T23:56:05+5:302015-02-28T23:56:15+5:30
जिल्ह्यात बेमोसमी पाऊस

बळीराजा हवालदिल : द्राक्षासह कांदा पिक धोक्यात
नाशिक : जिल्ह्यातील दिंडोरी, सिन्नर, इगतपुरी, निफाडसह जिल्ह्यात शनिवारी बेमोसमी पावसाने पावसाने हजेरी लावली. द्राक्षे, कांद्यासह इतर पिकांचे नुकसान झाले आहे.
दिंडोरी : अवेळी आलेल्या पावसाने दिंडोरी व परिसरात द्राक्षे, गहू व पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सायंकाळच्या सुमारास दिंडोरी, तळेगाव लखमापूर, करंजवन, वणी, पांडाणे, ओझरखेड, खेडगाव, जऊळके आदि परिसरात पावसाने हजेरी लावल्याने शेतपिकाचे नुकसान झाले. द्राक्ष खुडणीचा हंगाम सुरू झाला असल्याने बेमोसमी पावसामुळे आता शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणीच पळाले आहे. पावसामुळे द्राक्ष खरेदी करणारे व्यापारी आता कमी बाजारभावात द्राक्ष खरेदी केल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. वाढती महागाई, बी-बियाणे रासायनिक खते व औषधे यांचे वाढलेले बाजारभाव यामुळे उत्पादन खर्चात झालेली वाढ व सततचा अवेळी येणारा पाऊस या सर्व परिस्थितीचा सामना करत येथील शेतकऱ्यांनी द्राक्ष, गहू आदिंसह भाजीपाला पिके घेतली; परंतु या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरीवर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
कसबे सुकेणे - कसबे सुकेणे, मौजे सुकेणे परिसरात शनिवारी दुपारी सव्वातीन वाजेच्या सुमारास बेमोसमी पाऊस झाला. दरम्यान या पावसामुळे द्राक्षबागांना फटका बसला असून, बेदाणा उत्पादकांनीही चिंता व्यक्त केली आहे. कसबे सुकेणे परिसरात अडीच वाजेच्या सुमारास मध्यम व हलक्या स्वरूपाचा पाऊस सुरू झाला. दुपारी १ वाजेनंतर वातावरणात बदल झाला. ढगाळ वातावरण होऊन निफाड तालुक्यातील निफाडसह बाणगंगा काठच्या कसबे सुकेणे, मौजे सुकेणे, ओणे, थेरगाव, दात्याणे, जिव्हाळे दीक्षी या परिसरात सायंकाळी ५ वाजेपर्यंत पाऊस सुरु होता.
वणी - वणी परिसरात हलक्याशा पावसाचा शिडकावा झाल्याने वातावरणात कमालीचा बदल झाला. सकाळपासून ढगाळ हवामानामुळे पावसाचे संकेत प्राप्त होत होते. दुपारी ३ वाजेच्या सुमारास गार वारे वाहू लागले. पावसाची चाहुल जाणवत असताना पावसाचा शिडकावा झाला. या पावसामुळे फारसे नुकसान होणार नसले तरी ज्या द्राक्षबागाची खुडणी सुरू आहे त्यावर प्रतिकूल परिणाम झाला.
येवला - शहर व परिसरात पावसाने शनिवारी सायंकाळच्या सुमारास हजेरी लावली. परिसरातील अनेक ठिकाणी विजेने दडी मारली. ऐन परीक्षेच्या हंगामात वीज गायब झाल्याने विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली. पावसामुळे तपमानात घट झाली असली तरी सारे ऋतुचक्र बदलले आहे.
खामखेडा - परिसरामध्ये सकाळी ११ वाजेपासून ढगाळ वातावरण होते. सध्या सर्वत्र रागडा कांदा काढणीचा हंगामा चालू असल्याने शेतामघ्ये सर्वत्र कांद्याचे ढीग उघड्यावर होते. तसेच काही शेतकऱ्यांनी गव्हाची कापणी केली असल्याने आणि तोही उघड्यावर शेतात होता. दिवसभर फक्त ढगाळ वातावरण होते. पावसाची शक्यता नव्हती. परंतु सायंकाळी अचानक ६ वाजेच्या सुमारास सुरुवातीस जोरात वारा येऊन तुरळक पावसाच्या सरी पडू लागल्याने शेतकऱ्यांची शेतातील उघड्यावर असलेला कांदा व गव्हू झाकण्यासाठी धावपळ उडाली. काही ठिकाणी जोरदार वाऱ्यामुळे शेतातील उभा गहू पडून गेला. त्यामुळे गव्हाचे नुकसान होईल की काय अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे.
लासलगाव - शनिवारी दुपारी अचानक झालेल्या पावसाने लासलगाव जलमय होऊन रोगट वातावरण तयार झाले. थंडीने लासलगावकर गारठले. अचानक झालेल्या पावसाने लासलगावचे जनजीवन विस्कळीत झाले. तसेच लोकांना घराबाहेर पडणे कठीण झाले. कांदा व मका व्यापारी वर्गाला या पावसाने माल झाकणे मुश्कील झाले.
मनमाड - शहर व परिसरात तुरळक पावसाचा शिडकावा झाला असून, वातावरणात कमालीचा गारवा निर्माण झाला आहे. या पावसामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. परिसरात आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण तयार झाले होते. दुपारनंतर वादळीवाऱ्यासह किरकोळ पावसाचा शिडकावा झाला. (लोकमत चमू)