बागलाण काँग्रेसचा वाद चव्हाट्यावर
By Admin | Updated: November 27, 2014 23:22 IST2014-11-27T23:21:54+5:302014-11-27T23:22:11+5:30
गट तट : निवेदन देताना वेगवेगळे गट

बागलाण काँग्रेसचा वाद चव्हाट्यावर
सटाणा : बागलाण विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे सलग पानिपत झाले. अनामत गमावलेल्या काँग्रेसमध्ये अपयशाचे खापर एकमेकावर फोडण्यावरून पक्षांतर्गत चांगलाच वाद उफाळून आला आहे.
बागलाण दुष्काळी तालुका म्हणून जाहीर करा या मागणीसाठी शहराध्यक्ष व तालुकाध्यक्ष यांनी आपापल्या कंपूतील कार्यकर्त्यांसोबत स्वतंत्र निवेदन सादर केल्यामुळे व तालुकाध्यक्षांच्या वास्तव्यावरून थेट आरोप केल्यामुळे पक्षांतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला आहे. राज्यात दुष्काळी परिस्थिती असताना सरकारकडून दुष्काळ निवारणासाठी कुठल्याही उपाययोजना नाही. म्हणून कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरावे, असे फर्मान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी सोडले आहे. आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून तालुका दुष्काळी जाहीर करा अन्यथा रस्त्यावर उतरू असा इशारा देणारे निवेदन बागलाण कॉंग्रेसच्या वतीने एकित्रत देण्यात येणार होते. मात्र शहराध्यक्ष किशोर कदम , तालुका कार्याध्यक्ष प्रा. गुलाबराव कापडणीस, नगरसेवक मनोज सोनवणे, राहुल सोनवणे, मनोज सोनवणे या गटाने तालुकाध्यक्ष साखरचंद कांकरिया यांच्या वास्तव्यबाबत सवाल उपस्थित करत पुण्याहून पक्षाचा कारभार करणारा ‘कारभारी’ आम्हाला नको म्हणून त्यांनी सकाळीच तहसीलदारांना निवेदन सादर केले. (वार्ताहर )