काळ्या बाजारात गेलेले धान्य पुन्हा दुकानात
By Admin | Updated: April 3, 2017 01:05 IST2017-04-03T01:04:50+5:302017-04-03T01:05:05+5:30
वडनेर भैरव : काळ्या बाजारात गेलेले रेशनचे धान्य रात्रीच्या अंधारात पुन्हा दुकानात ठेवण्याचा रेशन दुकानदाराचा प्रयत्न नागरिकांनी हाणून पाडला.

काळ्या बाजारात गेलेले धान्य पुन्हा दुकानात
वडनेर भैरव : उपसरपंचाने केलेल्या तक्रारीची चौकशी होण्याची शक्यता असल्याने काळ्या बाजारात गेलेले रेशनचे धान्य रात्रीच्या अंधारात पुन्हा दुकानात ठेवण्याचा रेशन दुकानदाराचा प्रयत्न सतर्क नागरिकांनी हाणून पाडला. चांदवड तालुक्यातील पारेगाव येथे ही घटना घडली. दरम्यान, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर दुकानाला सील करण्यात आले आहे.
पारेगाव येथे शासनमान्य रेशन दुकान असून, पारेगाव व इंदिरानगर ही दोन गावे या दुकानाला जोडली आहेत. या दुकानातून धान्याची परस्पर विक्री केली जात असते. महिन्याआड धान्याचा घोटाळा होत असतो. शिवाय या महिन्याचे धान्य पुढच्या महिन्याला वितरित केले जाते. मार्च महिन्याचे धान्य अद्याप वितरित केले गेलेले नाही. या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी पारेगावचे उपसरपंच रमाकांत शिंदे यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात केली होती. याची कुणकुण रेशन दुकानदाराला लागल्याने चौकशीचा धसका घेऊन परस्पर विल्हेवाट लावलेले धान्य टेम्पोमध्ये भरून रात्री दोन वाजेच्या सुमारास पुन्हा दुकानात आणले. दुकानदाराकडून असा काही प्रकार होऊ शकतो अशी शक्यता गृहीत धरुन गावातील ग्रामस्थ सतर्क होते. टेम्पोतून दुकानात माल उतरविताना नागरिकांनी रंगेहाथ पकडल्याने रेशन दुकानदाराचे धाबे दणाणले आहे. या प्रकारामुळे मार्च महिन्यात नागरिकांना धान्य वितरित करण्यात आले नसल्याचे उघड झाले आहे.या प्रकाराची संबंधित विभागाला माहिती दिल्यानंतर तहसीलदार शरद मंडलिक, तालुका पुरवठा अधिकारी बी. पी. खंगरे, अव्वल कारकून दिलीप मोरे, गुदामकीपर केतन चंदनवार यांनी पंचनामा करून रेशन दुकान सील केले आहे.
रेशन दुकानदाराला २० मार्चला धान्य देण्यात आले होते. १ एप्रिलपर्यंत धान्य वाटप करण्यात आले नव्हते. महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत धान्य वाटप करणे सक्तीचे असताना मुलीच्या आजारपणाचे कारण देत दुकानदाराने धान्य वाटप केलेच नाही. निवेदन दिल्यानंतर पसार केलेला माल गुदामामध्ये आणून टाकण्याचा प्रयत्न केला; मात्र तो सतर्क नागरिकांनी उधळून लावला. यावर दुकानदाराने गुदाम नादुरुस्त असल्याने घरात साठा ठेवला होता. मात्र चौकशी होईल या भीतीने तेथून माल गुदामामध्ये टाकत होतो, असे सांगितले. गुदाम जर नादुरुस्त होते तर घरातूनच मालाची विक्री का केली नाही, इतका मोठा साठा छोट्याशा घरात बसला कसा, गुदामाऐवजी घरात माल टाकण्याची परवानगी घेतली होती का, घर व गुदाम यांच्यात केवळ २०० फूट इतके अंतर असताना इतका मोठा टेम्पो लावून माल बारदानाच्या साहाय्याने झाकून का आणला, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मार्च महिन्याचा साठा व पंचनामा झालेला साठा यात मोठी तफावत असल्याचेही उघड झाले आहे.
या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी उपसरपंच रमाकांत शिंदे यांनी केली आहे. (वार्ताहर)