‘वसुंधरा मित्र’ पुरस्कार प्रदान

By Admin | Updated: August 8, 2014 01:59 IST2014-08-08T01:58:21+5:302014-08-08T01:59:05+5:30

‘वसुंधरा मित्र’ पुरस्कार प्रदान

Awarded 'Vasundhara Mitra' | ‘वसुंधरा मित्र’ पुरस्कार प्रदान

‘वसुंधरा मित्र’ पुरस्कार प्रदान

 

नाशिक : किर्लोस्कर वसुंधरा महोत्सवात जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह यांच्या हस्ते डॉ. संजय गायकवाड, राजेश पंडित आणि नीलेश ठाकूर यांना ‘वसुंधरा मित्र’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी डॉ. राजेंद्रसिंह यांनी गोदावरीच्या प्रदूषणमुक्तीसाठी नाशिककरांना सामूहिक प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
कुसुमाग्रज स्मारकात किर्लोस्कर क्लब आणि वसुंधरा क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन डॉ. राजेंद्रसिंह यांच्या हस्ते झाले. याचवेळी जखमी प्राण्यांवर उपचार करणारे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. संजय गायकवाड, गोदावरी प्रदूषणमुक्तीचा लढा उभारणारे राजेश पंडित आणि इको क्लबच्या माध्यमातून पर्यावरणपूरक उपक्रम राबविणारे रचना विद्यालयातील शिक्षक नीलेश ठाकूर यांना सन्मानपत्र, मानचिन्ह देऊन वसुंधरा मित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी डॉ. राजेंद्रसिंह यांनी आगामी कुंभमेळा हा ग्रीनकुंभ व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करत, गोदावरीच्या शुद्धिकरणासाठी सार्वत्रिक प्रयत्नांची गरज असल्याचे सांगितले. यावेळी छायाचित्रकार ललित देशमुख यांनीही मनोगत व्यक्त केले. डॉ. संजय गायकवाड यांनी प्राण्यांविषयी निसर्गप्रेमींनी दाखविलेली तळमळच मला माझ्या कामावरील निष्ठा वाढवित गेल्याचे सांगितले. राजेश पंडित यांनी ग्रीन कुंभसाठी कृती आराखडा लवकरच तयार करण्यात येणार असल्याचे सांगितले. नीलेश ठाकूर यांनी इको क्लबच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. प्रारंभी हेमंत बेळे यांनी स्वागत केले. किर्लोस्कर उद्योगसमूहाचे वरिष्ठ महाव्यवस्थापक मकरंद देवधर यांनी उद्योगसमूहाच्या पर्यावरणपूरक उपक्रमांची माहिती दिली. वीरेंद्र चित्राव यांनी महोत्सवाच्या आयोजनाचा उद्देश विशद केला. सूत्रसंचालन गौतमी देशमुख हिने केले. (प्रतिनिधी)

Web Title: Awarded 'Vasundhara Mitra'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.