जिल्ह्यातील धोकेदायक ठिकाणांवर लक्ष
By Admin | Updated: August 2, 2014 01:23 IST2014-08-01T22:41:18+5:302014-08-02T01:23:56+5:30
सीमेवरील धरणाची गळती : गुजरात राज्याशी संपर्क

जिल्ह्यातील धोकेदायक ठिकाणांवर लक्ष
नाशिक : माळीण येथील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जिल्ह्णातील धोकेदायक ठिकाणांची माहिती गोळा करून ज्या ठिकाणी दरडी कोसळू शकतील अशा ठिकाणांवर लक्ष केंद्रित केले आहे. दुसरीकडे महाराष्ट्र-गुजरात सीमेवर सापुतारालगत असलेल्या धरणातून गळती सुरू झाल्यामुळे नजीकच्या गावांना निर्माण होणाऱ्या संभाव्य धोक्याबाबत गुजरात सरकारशी संपर्क साधण्यात आला आहे.
जिल्ह्णातील पेठ, सुरगाणा, इगतपुरी व त्र्यंबकेश्वर या भागांत गेल्या चार-पाच दिवसांपासून जोरदार पाऊस होत असल्यामुळे काही ठिकाणी माळणीसारखी दरड वा डोंगर कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मोठी दुर्घटना टाळण्यासाठी अगोदरपासूनच नागरिकांमध्ये जागृती करण्याबरोबर दुर्घटना प्रतिबंध उपाययोजना करण्याबाबत जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. ज्या गावांना अशा स्वरूपाचा धोका आहे, तेथील नागरिकांना संभाव्य धोक्याची कल्पना देण्यासाठी दवंडी पिटण्याचे ठरविण्यात आले. त्याचबरोबर धोकादायक भाग उतरून घेण्याचे व यंत्रणेला सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, कळवण तालुक्यांतील नद्या, नाल्यांच्या पुरामुळे काही गावांचा संपर्क तुटला असून, त्यासाठी पर्यायी मार्गाची व्यवस्था करण्यात आली. महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील सापुतारानजीकच्या मंगलीदिगर येथे गुजरात सरकारने बांधलेल्या मध्यम धरणाला गळती लागली असून, ते धोकेदायक स्थितीत आहे. या धरणाला लागूनच खालच्या बाजूला तलाव आहे. सध्या हा तलाव पाण्याने पूर्ण भरला असून, जर गुजरातचे धरण फुटले तर मोठे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी गुजरात सरकारशी व संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. पालकमंत्री छगन भुजबळ यांनीही यासंदर्भात पाठपुरावा करण्याच्या सूचना दिल्या.