अस्वली स्टेशनला गहू जळून खाक
By Admin | Updated: April 18, 2016 23:00 IST2016-04-18T22:52:11+5:302016-04-18T23:00:48+5:30
अस्वली स्टेशनला गहू जळून खाक

अस्वली स्टेशनला गहू जळून खाक
बेलगाव कुऱ्हे : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागात असलेल्या अस्वली स्टेशन परिसरातील पागेरे मळ्यात सोंगून ठेवलेला गहू आगीत भस्मसात होऊन अंदाजे ६० हजारांचे नुकसान झाले आहे.
येथील शेतकरी रतन चंदर पागेरे यांनी मोठ्या मेहनतीने शेतीमध्ये पिकवलेला दोन एकर क्षेत्रातील गहू जळून खाक झाल्याने ते हतबल झाले आहेत. काल रविवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास सदर शेतकरी एका विवाह सोहळ्यासाठी गेले असता हा गट नंबर ३०७ या क्षेत्रातील गहू पूर्णपणे आगीत खाक झाला. शेजारी असलेल्या जमिनीतील गहू मजुरांनी जळताना वाचवला; मात्र पागेरे यांचा २० पोत्यांचा सोंगलेला गहू जळाला. कारण मात्र समजले नाही. या पार्श्वभूमीवर अस्वली स्टेशन येथील शेतकरी रतन पागेरे यांनी आगीत खाक झालेल्या गव्हाचा पंचनामा तत्काळ करावा, अशी मागणी केली आहे. पूर्व भागातील शेतकरी पाणीटंचाईचा सामना करीत मोठ्या मेहनतीने रब्बी पिके घेतात; मात्र निसर्गाच्या अवकृपेमुळे आणि आगीत भस्मसात झालेल्या गव्हामुळे डोळ्यात आसवांची दाटी होत आहे. (वार्ताहर)